सर्वधर्मीयांनी जन आक्रोश मोर्चा काढत व्यक्त केला संताप
मोर्चात मुस्लिम बांधवांचा लक्षणीय सहभाग
छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्रित येत जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मुस्लिम बांधवांचा सहभाग लक्षणीय होता. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत बळी गेलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या मोर्चाला शिवाजी चौकातून प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख चौकातून व मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी "पुरा भारत क्या चाहता है... बदला...बदला...बदला", "गोली नही तो बम से, खून का बदला खून से", "जात नाही धर्म पूछा" आदी घोषणांचे फलक नागरिकांनी हातात घेतले होते. पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्वांनी संताप व्यक्त केला. दसरा चौकात या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





