भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गडहिंग्लज (प्रतिनिधी): देशाच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात समान नागरी कायदा UNIFORM CIVIL CODE ( UCC) संमत करावा अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मता यासाठी केंद्र सरकारने समान नागरी कायदा करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी राज्यघटनेत दुरूस्ती करून देशातील 2/3 दोन तृतीयांश बहुमताने राज्यांची संमती घेणे आवश्यक आहे. देशात संघ-राज्य शासनपध्दती असल्याने त्यासाठी थोडा अवधी लागतो. स्वतंत्र आणि सार्वभौम देशात वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. हे समृध्द लोकशाहीला पोषक आणि अभिप्रेत नाही. एकसमान नागरी कायदा करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. पण राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 नुसार राज्य शासनही समान नागरी संहिता पारीत करून त्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू शकतात. गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यांनी त्यासाठी मसुदा समिती गठीत केली आहे. याकरिता पुरोगामी महाराष्ट्र राज्यात विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात आदर्शवत समान नागरी कायदा ( UCC) पारित करावा अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.

