आजरा अन्याय निवारण समितीची मागणी
आजरा (हसन तकीलदार ) : आजरा नगरपंचायत प्रभाग रचना, मतदार यादी यासारखी अनुषंगिक कामे या महिन्यापासून सुरु झालेली आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात वास्तव्यास नसणाऱ्या परंतु मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांची संख्या आढळून आल्याचे दिसून येत असल्याचे मत अन्याय निवारण समितीचे आहे. अशा मतदारांना मतदार यादीतून वगळण्याची मागणी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. दरम्यान, तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती निवडणुकीत सक्रिय होत मतदारांची यादी व त्याअनुषंगिक माहितीचे आकलन करताना त्यांच्या निदर्शनास असे दिसून आले आहे की काही मतदार हे प्रत्यक्षात संबंधित प्रभागात वास्तव्यास नसून ते परगावचे रहिवासी आहेत. असे मतदार केवळ नाव नोंदवून मतदानाचा लाभ घेत आहेत परंतु वास्तवात त्याठिकाणी ते वास्तव्यास नाहीत. या प्रकारांमुळे निवडणुकीत स्थानिक नागरिकांच्या मताधिकारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व न्याय्य राहण्यासाठी अशा बाहेरील व वास्तव्यास नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वागळण्यात यावी. त्याचप्रमाणे जर असे मतदार मतदान करताना आढळून आल्यास किंवा त्यांच्याविषयी तक्रार आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्याबरोबरच आजरा तहसीलदार यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, विजय थोरवत, मिनिन डिसोझा, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, सी. डी. सरदेसाई, वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर उपस्थित होते.

