आजरा (हसन तकीलदार) : सद्यस्थितीमध्ये गिरणी कामगारांनी दलालांपासून सावध रहावे, मुंबईमध्ये सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांचा २००५ पासून सुरू झालेला लढा ग्रामीण भागात २००८ मध्ये सुरू झाला. सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील गिरणी कामगारांना जागृत करण्यात आले, चळवळीच्या दबावामुळे 2010 व 2011साली गिरणी कामगारांची माहिती संकलन करून, फॉर्म भरण्यासाठी सरकारला भाग पाडले गेले. संघटनेच्या रेट्यामुळे, तत्कालीन कॉग्रेस सरकारने मुंबईमध्ये घरे बांधून, लॉटरी काढण्याचे काम सुरू केले. परंतु आज सरकारचे काही दलाल फसवणूक करून मुंबई बाहेर घरे देण्याचा घाट घालत आहेत आणि या फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन कॉ. शांताराम पाटील यांनी केले आहे.
2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांनी आजपर्यंत एकही घर मुंबई मध्ये बांधलेले नाही. उलट गिरणी कामगारांना कोनगाव, पनवेल या ठिकाणीची एम.एम.आर. डी.ची घरे, मुंबई बाहेर देण्याचे षडयंत्र या सरकारने रचले असून, आता तर मुंबई पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी, सेलू येथील घरे गिरणी कामगारांच्या माथी मारण्यासाठी दलाला मार्फत षडयंत्र रचले जात असून गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घालविण्याचे पाप महायुती सरकार करत आहे. असा आरोपही करण्यात आला आहे.
आज सर्व श्रमिक संघटना व इतर संघटनाच्या वतीने गिरणी कामगारांना मुंबईमध्ये मोफत घरे हा लढा अधिक तीव्र ताकदीने उभा करण्याचा प्रयत्न केला जात असताना, काही दलाल संघटना सरकारला मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत, हा डाव हाणून पाडला पाहिजे. या विचाराने सर्व गिरणी कामगार वारसदार यांनी मोठ्या ताकदीने जागरूकपणे संघर्षामध्ये उतरले पाहिजे, तसेच गिरणी कामगारांनी दलालांच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष कॉ. शांताराम पाटील, नारायण भंडागे, शिवाजी सांवत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.


