Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजी-माजी लोकप्रतिनिधीनी टोलविरोधी आंदोलनात सहभागी होऊनही टोलधाड का?

संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग:  आजरा टोलमुक्ती संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार ! 




आजरा (हसन तकीलदार ) : गेली वर्ष दीड वर्षे संकेश्वर-बांदा महामार्गावरील टोल विरोधात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि विविध संघटना टोलमुक्ती संघर्ष समितीच्या बॅनरखाली एकत्रित येत लढा देत आहेत. मोर्चा, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न झाले. याबाबत महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत तीन चार बैठका झाल्या. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याखेरीज टोलचा निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. सद्याचे पालकमंत्री व तत्कालीन पालकमंत्री यांनीही वरिष्ठ पातळीवर टोलसंदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन टोल रद्द करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतले जाईल असेही आश्वासन देण्यात आले होते. टोल रद्द होण्यासाठी शासकीय पातळीवर व कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे टोलमुक्ती संघर्ष समितीने ठणकावून सांगितले होते. पण संघर्ष समितीला काहीही कल्पना न देता महामार्ग अधिकाऱ्यांनी टोल नाका चालू करण्याची घोषणा करून आजरेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आजरा तालुकावासीयांची घोर फसवणूक असल्याची प्रतिक्रिया टोल मुक्ती संघर्ष समितीने दिली आहे.

      



यावेळी प्रत्येकाने आपली मते मांडत मनातील खदखद बाहेर काढली. आपले मत मांडताना डॉ. धनाजी राणे म्हणाले की, आजरा तालुका हा डोंगरी भाग व दरडोई उत्पन्न कमी असणारा तसेच राजकीय दृष्ट्या तुकडे झालेला भाग आहे. उत्पन्न कमी असल्याने रोजी रोटीसाठी येथील तरुण मुंबई, पुणा, गोवा इत्यादी ठिकाणी रोजगारासाठी जातात. अशा गर्तेत सापडलेल्या तालुक्यावर पुन्हा एकदा टोलचे भूत मानगुटीवर बसायला सज्ज झाला आहे. यासाठी संघर्ष करण्याशिवाय आम्हा आजरेकरांना पर्याय नाही.

   


डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले की, ज्यावेळी आंदोलन सुरु झाले होते त्यावेळी तिन्हीही आमदार तसेच खासदार यांनी हा टोल सुरु होणार नाही असे सांगितले होते. परंतु त्यानंतर सुद्धा हा टोलनाका सुरु करण्यात येत आहे. हे निश्चितच अतिशय चुकीचे आणि अन्यायकारक आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचे कोणतेही निकष लागू होत नसतानाही यावर टोल आकारणी होत असेल तर बहुजन मुक्ती पार्टीचा याला तीव्र विरोध असेल आणि यासाठी आम्ही तिव्र लढा देऊ. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार टू लेन पेव्हड शोल्डर्स असणारा रस्ता 15500 मिलिमिटर रुंदीचा असला पाहिजे, याची रुंदी 15500 मिलिमिटर पेक्षा कमी असेल तसेच महामार्गाचे कोणतेही निकष पूर्ण होत नसतील तर आजरेकरांनी टोल का भरावा? 28 ऑगस्ट 2024 रोजी जो रस्ता रोको आंदोलन झाले होते त्यानंतर पुढे काय झाले? हे अद्याप आम्हा कोणालाही समजलेले नाही.

  


कॉ. संपत देसाई म्हणाले की, गेली दीड वर्षे आम्ही आंदोलने करीत आहोत. हा धोरणात्मक निर्णय असल्याने वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याखेरीज टोलचा निर्णय घेतला जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण तसे काहीही न करता महामार्ग अधिकाऱ्यांनी टोल नाका चालू करण्याची घोषणा करून आजरेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

  


शिवसेना (उबाठा )कडुनही आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

   


उद्या शुक्रवारी आजरा येथील टोलनाका सुरु होणार असल्याने आजरेकरांच्या मनात खदखद सुरु आहे. आजरेवासियांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर टोलधाड पडलीच. वरीष्ठाशी आजअखेर बैठक न घेता अचानक टोल वसुल करण्यात येत असल्यामुळे टोलला हद्दपार करण्यासाठी उद्या शुक्रवारी सकाळी 8:00 वा.टोल नक्यावर आजरेकर व टोलला विरोध करणाऱ्या आसपासच्या लोकांनी जमा होण्याचे आवाहन टोलमुक्ती संघर्ष समितीने केले आहे. एकंदरीत टोलविरोधात संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.