शिवसेना उबाठाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हरपवडे धनगरवाडा येथील धोंडीबा झोरे यांच्या मृत्यूने आरोग्य विभागाचा कारभार चर्चेत
आजरा (हसन तकीलदार) : स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला, डिजिटल इंडियाची घोषणा झाली परंतु आजही दुर्गम खेड्यातील जनतेला आरोग्यसेवेसाठी झुंझावे लागत आहे. जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाहीत याला दुर्दैव्य म्हणावे नाही तर काय म्हणावे? हरपवडे धनगरवाडा (ता. आजरा) येथील धोंडिबा झोरे यांचा वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला ही घटना मनाला चटका लावून जाते. याच धनगरवाड्यावर दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने भागुबाई झोरे या महिलेचाही मृत्यू झाला होता. यासाठी दुर्गम खेड्यातील जनतेला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून दोषीवर कडक करावाई करावी अशा आशायाचे निवेदन शिवसेना उबाठाने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात कॅबिनेट दर्जाचे दोन मंत्री असतानासुद्धा याच जिल्ह्यातील वाड्या वसाहतीवरील आरोग्य सेवेचे ढिसाळ चित्र ठळकपणे समोर आले आहे. हरपवडे धनगरवाडा येथील धोंडिबा झोरे यांचा वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला. याच धनगरवाड्यावर दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने भागुबाई झोरे या महिलेचाही मृत्यू झाला होता. तर याच महिलेला प्रसूतीसाठी जंगलातून घेऊन जाताना धो धो पावसातच या महिलेची प्रसूती झाली होती. या घटनांच्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. या संदर्भात यशवंत क्रांती संघटनेने तक्रारी दिल्या, पाठपुरावा केला परंतु त्यांची गांभीर्याने नोंद घेतल्याचे दिसत नाही. धोंडिबा झोरे यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णावाहिकेतून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणले असताना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा असतानाही उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात घेऊन जावे असे बेजबाबदार उत्तर मिळाल्याचे आरोप या निवेदनात केले आहे. पहाटे कोल्हापूर सीपीआरला नेल्यानंतर तेथे बेड उपलब्ध नाही असे सांगण्यात आले. परिस्थिती गंभीर असतानाही दवाखान्यात दाखल करून घेतले नाही. फक्त उपदेशांचे डोसच दिले गेले. यातच धोंडिबा झोरे यांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी घेणार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार सेवा देण्याच्या घोषणा सातत्याने केल्या जातात प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील जनता वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने त्रस्त आहे. धोंडिबा झोरे मृत्युकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे.
जिल्हाप्रशासनाचे प्रमुख म्हणून या सर्व प्रकरणाची खास चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी आणि याला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले, संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख युवराज पोवार, दिलीप माने, सागर भावके आदींच्या सह्या आहेत.

