गडहिंग्लज (प्रतिनिधी): पवित्र प्रणाली मार्फत राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाली असून याबाबत बैठक घ्यावी यासाठी उद्या दिनांक 13 रोजी होणारे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती आजरा तालुक्यातील आरदाळ कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली.
2022 ची पदभरती संस्था पातळीवरील टप्पा दोन मुलाखतीसह याची प्रक्रिया दिनांक 01 ते 21 जुलै 2025 पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच उमेदवारांना लांबचे जिल्हे देण्यात आले होते, शिवाय 1:10 उमेदवार देण्याची मुभा संस्थाचालकांना देण्यात आली मात्र ज्यांची निवड झाली नाही त्यांची हेळसांड होत आहे. याबाबत शासन पातळीवर विचार झालेला नाही. या प्रक्रियेत उमेदवारांचे फार मोठे हाल झाले शिवाय या प्रक्रियेमुळे उमेदवारांचे खच्चीकरण झाले आहे. याचा अनुभव माझ्या कुटुंबाला व मला आला आहे. माझ्या मुलग्याला दोन संस्था आल्या. आम्ही ओबीसी प्रकल्पग्रस्त आहोत. त्यामध्ये सांगली व सातारा जिल्ह्याचा समावेश होता.
सांगलीच्या संस्थेची मुलाखतीचे ठिकाण वाहनांची गैरसोय असणारे आटपाडी तालुक्यातील झरे गाव होते. सदर ठिकाणी मुलाखती झाल्या आहेत मात्र त्या मुलाखती अध्यापन कौशल्याची तपासणी करण्यासाठी सदर कक्षा वर्ग खोलीमध्ये नियमाप्रमाणे सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पारदर्शकता दाखवली नाही असे दिसते. याबाबत माहिती मिळावी, तसेच ओबीसी प्रकल्पग्रस्त एक ते पाच प्राथमिकसाठी सदर संस्थेमध्ये किती उमेदवार आले व त्यांचे पडलेले मार्क, घेतलेली मुलाखत कोणाची निवड झाली आहे किंवा जागा मुद्दाम काही कारण देत रिकामी ठेवली आहे याची माहिती मिळावी, यावर इतर शंका निरसन करण्यासाठी तसेच कोणत्या संस्थांनी दिलेले उमेदवार पूर्णपणे भरती करून घेतले याबाबत माहिती व चर्चा होणे गरजेचे आहे. यासाठी कार्यालयात सांगली संस्था महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिनिधी व प्राथमिक शिक्षण विभागाचे सांगली कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. बैठक दहा दिवसात न झाल्यास व लेखी माहिती न मिळाल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यदिना दिवशी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिला होता. तथापि शिक्षण विभागातील अधिकारी सामुदायिक रजेवर गेल्याचे समजल्याने उद्याचे सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे कॉम्रेड गुरव यांनी सांगितले.

