Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आवंडी वसाहतीच्या मूलभूत प्रश्नांबाबत अन्याय निवारण समिती आक्रमक ; नगरपंचायतीची सकारात्मक भूमिका



आजरा (हसन तकीलदार) : आजरा तालुक्यातील आवंडी गावातील लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन, आपल्या वाडवडिलांची आठवण म्हणून जपलेली घरे सोडून शेजारच्या तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी गांधीनगरजवळील आवंडी वसाहतीत जड अंतःकरणाने येऊन राहिले आहेत. ज्यांनी आपल्या घरादाराचा, शेतीचा त्याग दिला त्यांनाच आज अनेक समस्यानी ग्रासले आहे. त्यांना आज आपल्या मूलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागतो आहे. जमिनी गेल्या त्यावेळीही संघर्ष करावा लागला आणि आताही त्यांना संघर्ष करावा लागतो हे शोकनीय आहे. कचरा डेपोजवळील कचरा वसाहतीजवळ टाकत असल्यामुळे दुर्गंधीत जगावे लागत आहे. वेगवेगळ्या आजरांना बळी पडावे लागत आहे. तर दोन चार दिवसआड पाणी येत आहे. पथदिवे गुल आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरु आहे या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजरा अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली आवंडी वासहत वाल्यांनी नगरपंचायतिकडे कूच केली. यावेळी सर्व समस्यांचा पाढा वाचण्यात आला एकेक प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली त्यानुसार मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

      


यावेळी मुख्याधिकारी सूरज सुर्वे म्हणाले, आवंडी वसाहतीच्या आजूबाजूला टाकलेला सर्व कचरा तातडीने साफ करण्यात येईल. वसाहत परिसर व शेजारील मैदान या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्याचप्रमाणे आवंडी वसाहतीमध्ये यापूर्वी एक किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत होता त्याचीही दखल घेत रोज सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे ज्या कनेक्शनना पाणी कमी दाबाने येते त्यावरही उपाययोजना केली जाईल. पथदिव्यासाठी विजतांत्रीची सोय होताच बंद असलेली पथदिवे लावण्यात येतील अशी सकारात्मक भूमिका घेत मुख्याधिकारी यांनी उपस्थिताना आश्वासन दिले. 



याबरोबरच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीत टाकावा. मनुष्यबळ कमी असल्याने ओला व सुका कचरा वेगळा करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थित विल्हेवाट होत नाही व परिणामी दुर्गंधी पसरते. आपल्या आरोग्याची काळजी घेत दोन वेगवेगळ्या बदल्यामध्ये ओला आणि सुका कचरा गोळा करून घंटा गाडीत टाकावा. जे लोक असे करणार नाहीत त्यांचा कचरा घंटा गाडीत घेतला जाणार नाही असेही मुख्याधिकारी तसेच आरोग्य अधिकारी अमर कांबळे यांनी सांगितले. यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांच्यासह अन्याय निवारण समितीचे सर्व  पदाधिकारी व आवंडी वसाहतीतील  महिला आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.