गडहिंग्लजला शिंदे शिवसेना व युवासेनेचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरमहा ३५ किलो सवलतीच्या दरात धान्य दिले जाते. मात्र, आता पाचपेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना प्रतिमाणसी धान्य देण्याचे आणि मोठ्या कुटुंबांनाच ३५ किलो धान्य देण्याचे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. शासनाच्या या संभाव्य धोरणामुळे लहान कुटुंबांवर मोठा अन्याय होणार असून, ही अट रद्द करून सर्व अंत्योदय कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच ३५ किलो धान्य मिळावे, या मागणीचे निवेदन शिंदे शिवसेना गडहिंग्लज शहर संघटक काशिनाथ गडकरी आणि युवासेना तालुका संघटक सागर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना देण्यात आले.
गेल्या ३५ वर्षांपासून अत्यंत कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन समाजातील वंचित घटकांसाठी ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. अनेकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे या धान्यावरच अवलंबून आहे. आता कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालून धान्य कपातीचा घाट घातला जात असल्याने लहान कुटुंबांची उपासमार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने दोन्ही बाजूंचा सहानुभूतीने विचार करून धान्य वाटपात कोणताही बदल करू नये, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण पाछापूरे, संतोष सुळकुडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

