गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात फिजिक्स विभागाच्या वतीने शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे व प्रा.तेजस्विनी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. गौरव पाटील म्हणाले, थोर शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ज्ञानगंगा सुरू केली. समाजातील गोरगरीब, दीनदलित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ही ज्ञानगंगा आजही महाराष्ट्रभर विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. बापूजींच्या शैक्षणिक कार्यातून अनेकांचे आयुष्य उजळून निघाले आहे. त्यांच्या कार्यावर महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा प्रभाव होता. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार या त्रिसूत्रीतून विद्यार्थी घडला पाहिजे, यासाठी ते नेहमी आग्रही होते राहत होते. यावेळी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांच्यासह शिवराज विद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विजय सावंत यांनी केले. आभार प्रा. तेजस्विनी शिंदे यांनी मानले.

