शिवराज महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'स्वराज्य महोत्सव' व्याख्यानमालेस प्रारंभ
![]() |
| गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रीय काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याला भक्कम आधार देण्याचे कार्य केले, त्यामुळे आपला भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला. ही चळवळ अहिंसक मार्गाने सुरू ठेवली होती त्यामुळे जगात ही चळवळ अधोरेखित झाली आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत राष्ट्रीय काँग्रेसने मोलाचे योगदान दिले आहे. असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी केले.
शिवराज महाविद्यालयात 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते. प्रारंभी दिग्विजय कुराडे यांनी 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय काँग्रेसचे योगदान' या विषयावर पहिले पुष्प गुंफले. या व्याख्यानात मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याच्या चळवळीत कोणी कोणी कशाप्रकारे योगदान दिले याची नव्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आजच्या पिढीला समजला पाहिजे यासाठी याचे प्रयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ साली झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये सुरुवातीला ७२ जणांचा सहभाग होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बंगालच्या फाळणीला पहिल्यांदा विरोध केला आहे. सविनय कायदेभंग, आपल्या देशात स्वदेशीचे आंदोलन मोठ्या प्रमाणात करून या देशात इंग्रजांनी सुरू केलेल्या शोषणाला काँग्रेसने कडाडून विरोध केला असल्याचे ॲड. कुराडे यांनी सांगितले. स्वदेशीची चळवळ, असहकार आंदोलन करून इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध लढा दिला. १९१९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दबावामुळे 'गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट' इंग्रजांनी आणला. १९३६ साली पासून संपूर्ण देशात काँग्रेसचे प्राबल्य राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन.आर. कोल्हापूरे यांनी मतदार नोंदणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राज्यशास्त्र व ग्रंथालय विभाग आयोजित या कार्यक्रमात वीरशैव बँकेच्या तज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल राजशेखर येरटी यांचा सत्कार करण्यात आला. पदवीधर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, डॉ. राजेंद्र गुंडे, प्रा. आझाद पटेल, पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही. चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ए.जी. हारदारे यांनी केले. आभार प्रा. विक्रम शिंदे यांनी मानले.

