गडहिंग्लज (प्रतिनिधी): बँक ऑफ इंडिया शाखा उत्तूर मार्फत प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी शाळेत वृक्षारोपण व विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास बँकेच्या शाखा उपव्यवस्थापक सौ. वैशाली मुंज, अशोक लोखंडे ,अक्षय रावण, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अशोक करंबळे, सदस्य प्रतिनिधी वैभव कांबळे व रोशन भिऊंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा गुरव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शोभेची फुलझाडे तसेच बक्षीस वाटप करण्यात आले. बक्षीस वाटपानंतर अशोक लोखंडे यांनी अशा उपक्रमांचे महत्त्व सांगत बँकेच्या कार्याची उद्दिष्टे व विकासासाठी यापुढे सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनाबाबत सौ.वैशाली मुंज यांनी अभिनंदन करून शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे सहाय्यक शिक्षक सहित बजरंग यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ.सुरेखा कांबळे, दिनकर खवरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष गुरव यांनी केले.




