गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी न्याय मागण्यांसाठी आजऱ्यापर्यंत मोटरसायकल रॅली काढली. याद्वारे आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे त्यांनी लक्ष वेधले. या रॅलीचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले.
या मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ संकेश्वर- गडहिंग्लज मार्गावरील मुत्नाळ येथून करण्यात आला. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली. बाळेश नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला तर ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.
ही रॅली मुत्नाळ पासून निलजी, हेब्बाळ, दुंडगे गावातून गडहिंग्लज शहरात आली. पुढे रॅली आजरा पर्यंत नेण्यात आली. आजऱ्याजवळ आल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेचा निषेध करत संघटनेने ही रॅली आंबोलीपर्यंत न नेता आजऱ्यातच स्थगित करण्यात आल्याची माहिती श्री. गुरव यांनी दिली. यावेळी घोषणाबाजी करत बाधित शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


