Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे बैठक संपन्न 


कोल्हापूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखीन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कोल्हापुरी येथे आयोजित दोन्ही राज्यांच्या बैठकीत केली. 

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्द्यांबाबत कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे दोन्ही राज्यांची समन्वय बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच जिल्हे व कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या जिल्ह्यात परस्परात चांगला समन्वय आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या काही समस्या राज्यस्तरावरून सोडविल्या जाणे आवश्यक आहे त्याबाबत राज्य शासनाला सुचित करण्यात येईल, असे सांगून ही समन्वय बैठक पुढील काळात नक्कीच लाभदायक ठरेल असे त्यांनी सांगितले.

कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांनी या राज्यस्तरीय समन्वय बैठकीबाबत समाधान व्यक्त करून या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सर्व संबंधित स्थानिक प्रशासनाने परस्परात अधिक चांगला समन्वय निर्माण करून त्या भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.

आजच्या सामायिक मुद्द्यांबाबत आयोजित समन्वय बैठकीत सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जे सादरीकरण सादर केले त्या सादरीकरणाचे प्रस्ताव दोन्ही राजभवनकडे पाठवावेत. येथील राज्यस्तरीय मुद्द्यांच्या अनुषंगाने दोन्ही राज्य शासनाला राजभवन कडून सुचित करण्यात येईल, असे दोन्ही राज्यपालांनी यावेळी सांगितले

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?👇

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी दि. 26 जून 2020 च्या आंतरराज्य बैठकीत ठरल्याप्रमाणे कृष्णा नदीतील पुराचे पाणी प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी आणि पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्ट पर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मी. ते 517.50 मी च्या मर्यादेत राखली जावी. तर आजरा तालुक्यातील 3.10 टीएमसी क्षमता असलेला किटवडे मध्यम प्रकल्प कृष्णा नदी खोऱ्यातील घटप्रभा उपखोऱ्यात असून हा नवीन प्रकल्प आहे दोन्ही राज्यासाठी फायदेशीर प्रकल्प असल्याने परस्पर सहमत असलेल्या अटी व शर्तीसह आंतरराज्य प्रकल्प म्हणून हा प्रकल्प घेतला जाऊ शकतो अशी माहिती दिली.

गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने शिनोळी, संकेश्वर, कोगनोळी अंतर्गत मार्गांवर वाहनांची कसून तपासणी करून अवैध दारू वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधणे आवश्यक आहे. गुरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे, पशुखाद्य आणि चाऱ्यासाठी सुलभ व्यापार आणि बाजारपेठ, कर्नाटकातून हत्तींचे स्थलांतर आणि मानव- प्राणी संघर्षात झालेली वाढ विद्यार्थ्यांना नॅशनल मिन्स स्कॉलरशिप मिळण्याबाबत, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा कोविड आजारामुळे कर्नाटक राज्यात मृत्यू झालेला आहे अशा नागरिकांना भरपाई मिळणे तसेच सीमावर्ती भागात पीसीपीएनडीती कायद्याची कडक अंमलबजावणीची मागणी  रेखावर यांनी केली. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी कर्नाटक राज्यातील पोलीस विभागाशी समन्वय चांगला असल्याचे सांगितले.

सांगलीचे जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सन 2016-17 मध्ये महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्यातील अवर्षण प्रवण भागासाठी 6.865 टीएमसी पाणी सोडले होते, त्याप्रमाणे कर्नाटक शासनाने महाराष्ट्र राज्यातील जत व अक्कलकोट भागासाठी पाणी सोडणे, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या   बसेसना सांगली जिल्ह्यात बस स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात, त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही जिल्ह्यातील बसेसना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावेत. आरोग्य, उत्पादन शुल्क व पशुसंवर्धन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलिसांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवण्याबाबतची मागणी केली

सोलापूरचे जिल्हाधिकारी वाघमारे यांनी जिल्ह्यातील 40 साखर कारखान्याद्वारे मोलॅसिस तसेच गुळ पावडरची निर्मिती होते. तीन वर्षात मोलॅसिस वाहतुकीच्या अनुषंगाने 24 गुन्हे नोंदविले गेले आहेत. गेल्या तीन वर्षात सुमारे 703 मॅट्रिक टन मोलॅसिसची अवैध दारूसाठी विक्री झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क प्राधिकरणामध्ये योग्य तो समन्वय ठेवणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात जैतून बेकायदेशीर मोलॅसिस उचल केली जाते त्या साखर कारखान्यात तपासणीच्या अनुषंगाने सहज प्रवेश करणे त्याचबरोबर अवैध दारू विक्री मोलॅसिस गुन्ह्या संदर्भात दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये माहितीचे आदान प्रदान आवश्यक व संबंधित अधिकाऱ्यांवरील संयुक्तरीत्या छापेमारीची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी ओंबासे यांनी कलबुर्गी येथील बेकायदेशीर लिंग निदान बाबत ऑनलाईन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत उस्मानाबाद आरोग्य प्रशासनाने स्टिंग ऑपरेशनही केलेले आहे. त्याचप्रमाणे कलबुर्गी प्रशासनाने देखील लिंगनिदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात खुशखबर योजनेअंतर्गत लिंगनिदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचा निधी दिला जातो व नावही गोपनीय ठेवले जाते, त्याप्रमाणे कर्नाटक राज्याने ही योजना लागू करावी. तसेच अन्नसुरक्षक मानक अधिनियम  2006 च्या कलम 30(2) नुसार गुटखा व पानमसाला अनुषंगिक अन्य बाबींवर महाराष्ट्र राज्य प्रमाणे कर्नाटक राज्याने ही निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी कारंजा धरणातून पाणी सोडणे व हे पाणी बिदर जिल्ह्यातील चंद्रपूर बॅरेज पर्यंत नेण्यासाठी सिंधीकामठ केटीवेअरचे गेट्स काढणे व बसवणे बाबतची थकबाकी, कर्नाटक येथील शेतकरी पाण्याचा वापर करतात त्याची थकबाकी देण्याची मागणी केली. सीमावर्ती भागातील वाळू उत्खनन व स्वातंत्र्य सैनिकांच्या नोंदी कायदा व सुव्यवस्था सीमा वरती भागात अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमध्ये परस्पर समन्वय ठेवणे, तसेच गुन्हेगारांच्या माहितीची देवाण-घेवाण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृष्णा आणि प्रमुख नद्यांमध्ये महाराष्ट्रातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे पूरस्थितीचे व्यवस्थापन करणे व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाट मार्गे बेळगाव आणि महाराष्ट्र दरम्यान दर्जेदार रस्ते जोडणीची गरज आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये  पोहोचविण्यासाठी बेळगाव येथून मालवाहू वाहनांना विना अडथळा प्रवेश मिळणे. बेळगावच्या एमएसएमईने पुरविलेल्या साहित्यासाठी उद्योजकांकडून वेळेवर देयक देणे व दोन्ही राज्यांच्या सीमेपलीकडील गुन्हे तस्करी अवैध दारू वाहतूक आणि इतर पोलीस सुरक्षा समस्यांशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी दोन्ही बाजूंमधील परस्पर सहकार्य गरजेचे असल्याबाबत सांगितले.

विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दनम्मानवर यांनी द्राक्ष बाजारातील समस्या जसे की सीमेवरील चेक पोस्ट वेळेवर पेमेंट इ. तसेच राज्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना पुरवल्या जाणाऱ्या दळणवळण आणि मूलभूत सुविधांबाबत लिंग गुणोत्तरात घट  PCPNDT कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी समान मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधा समस्या तस्करी आणि इतर गुन्ह्यांची संबंधित समस्या सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी उत्तम समन्वय ठेवण्याची मागणी केली.

बिदरचे जिल्हाधिकारी रेडी यांनी चोंडीमुखेड गावाशी संबंधित पायाभूत सुविधांबाबत समस्या प्रामुख्याने वीज, कर्नाटक राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात जाण्यासाठी सहकार्य करणे, रस्त्यांच्या उत्तम सुविधा निर्माण करणे व रोजगार निर्मितीला चालना देणे तसेच सीमेपलीकडून गुन्हेगारांच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची आवश्यकता सांगितली.

कलबुर्गीचे जिल्हाधिकारी गुरुकर यांनी सीमा ओलांडून अबकारी उत्पादनांची बेकायदेशीर वाहतूक थांबवणे. दोन्ही राज्यातील धार्मिक स्थळांना (देवळा गाणगापूर, गट्टारगा, भाग्यलक्ष्मी) भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंना दळणवळण आणि मूलभूत सुविधा, लिंग गुणोत्तरात घट, PCPNDT कायद्याची कठोर अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्याच्या लगतच्या गावांमधील कन्नड माध्यमांच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्याबाबत सुचित केले.

यावेळी दोन्ही राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक सामान्य नागरिक धार्मिक,पर्यटन, रोजगार, आरोग्य व अन्य कारणासाठी ये-जा करत असतात त्यांना दिशादर्शक फलक हे दोन्ही भाषेत (मराठी व कन्नड) करण्याबाबत समन्वय बैठकीत एक मतांनी चर्चा झाली. तर काही मुद्द्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. तर राज्यस्तरावरील मुद्द्यांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचित करणार आहेत.

रेसिडेन्सी क्लब येथील महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य बैठकीस महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे राज्यपाल  थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राजभवन येथील सचिव श्वेता सिंघल, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त के. पी. मोहनराज, कलबुर्गीचे प्रादेशिक आयुक्त कृष्णा वाजपेयी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी यशवंत गुरुकर, बिदरचे जिल्हाधिकारी गोविंद रेडी, विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर, बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन उंबासे, सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, बिदरचे पोलीस अधीक्षक डेक्का बाबू, विजयपूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर आनंदकुमार, उस्मानाबाद ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.