![]() |
| गडहिंग्लज: संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड शिवाजी गुरव. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी, घरमालक, दुकानदार यांनी पुनर्वसनासाठी गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, याबाबतचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असणारी झाडे तोडण्यात आली आहेत. साईडपट्टीची जागाही शेतकऱ्यांच्या नावावर आहे. त्याची वहीवाट त्या- त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचीच आहे. सध्या दोन पदरी म्हणजेच बारा मीटर रुंदीचा रस्ता होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी सांगत आहेत. लोकांची दिशाभूल करत आहेत असे दिसते. हा रस्ता गडहिंग्लज व आजरा शहरातून जाणार आहे. रस्ता करत असताना दोन्हीही शहरांना अवजड वाहने बाहेरून जाण्यासाठी बायपास रस्ता होणे गरजेचे आहे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची व घर असल्यास घरांची, जागेची मोजमाप करून बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासह इतर मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात शिवाजी इंगळे, धनगरमोळा सरपंच शंकर जाधव, जोतिबा शेटके, दत्तात्रेय नेसरकर ( हिरलगे), आनंदा येसणे (मडिलगे), आनंदा खराटे (खोराटवाडी), भरत मोहिते (अत्याळ), संजय खोराटे, अनिल खोराटे (खोराटवाडी), जयवंत थोरवतकर (जाधेवाडी), सुरेश गोडसे, (भादवण), विठोबा करडे ( जाधेवाडी), प्रकाश नाईक, काशव्वा नाईक (दुंडगे), कांचन बेळगुंदकर (खेडे), पंडित पाटील (भादवण), बाबुराव कांबळे, सचिन लोहार ( गिजवणे), अंतू कांबळे, विशाल कांबळे (मडिलगे) आदींसह महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

