चंदगड : शासकीय जमीन ताब्यात देण्याच्या आश्वासनानंतर चंदगड येथील वीरपत्नी शोभा शिवाजी पाटील यांनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. जमिनी संदर्भात वारंवार विनंती करूनही दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ चंदगड येथील माजी सैनिकांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन हाती घेतले होते.
वीरपत्नी शोभा शिवाजी पाटील यांना शासनाकडून मिळालेली जमीन प्रत्यक्ष कब्जा मिळवण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून लढावे लागत आहे. तसेच इतर माजी सैनिकांनाही संघर्ष करावा लागत आहे. याचा लाभ पुढील पिढीला मिळावा, अशी या कुटुंबीयांची इच्छा आहे. तहसील कार्यालयाला वारंवार भेटी देऊनही कामात प्रगती दिसत नसल्याने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह केला. यावेळी तहसील कार्यालयाने सत्याग्रहाची दखल घेतली. तत्काळ प्रलंबित कामे करून देण्याचे दिला आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
जमीन शासकीय मोजणी करून मिळावी, असा अर्ज वीरपत्नी श्रीमती पाटील यांनी केला होता. जवान शिवाजी कृष्णा पाटील हे राजस्थान येथे सेवा बजावत असताना शहीद झाले होते. दि. १ डिसेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. आठ दिवसांत जमीन मोजणी करून ताब्यात न दिल्यास सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला होता.
१९७६ साली सिलिंग मधून मिळालेली अडकूर येथील जमीन शासकीय मोजणी करून मिळावी असा अर्ज वीरपत्नी पाटील यांनी केला होता.

