गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रा. किसनराव कुराडे यांनी धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या लिखाणातून शाश्वत मानवी मूल्याच्या जीवनाचे धागेदोरे उलगडून समाजाला आनंदमय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल करवीर साहित्य परिषदेमार्फत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे असे उद्गार संत गाडगे महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रा.तु. भगत यांनी काढले.
शाहू सभागृहात महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्यकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, प्रसिद्ध विचारवंत इंद्रजीत देशमुख, प्राचार्य दिनकर पाटील यांच्या हस्ते उपस्थित साहित्यिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक शाम कुरळे, सौ. कमलादेवी कुरळे, रूपा शहा, कवी सरकार यांच्यासह साहित्यिकांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरिता बिडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन मुरलीधर देसाई यांनी केले. आभार श्री.गुरव यांनी मानले.



