गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या दूषित पाण्याचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्याचे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी नांगनूर येथील ग्रामस्थांना दिले.
गोटुर बंधाऱ्याजवळ हिरण्यकेशी नदीचे पाणी दूषित झाले असून पाण्यालाही वास येत आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर असणारे खासदार धनंजय महाडिक यांनी नांगनूर येथे भेट देत या दूषित पाण्याची पाहणी केली. यावेळी नांगनूर ग्रामस्थांनी निवेदन देत खासदार महाडिक यांचे लक्ष वेधले. या दूषित पाण्यामुळे उद्भवत असलेल्या विविध समस्यांची माहिती दिली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी हा प्रश्न दिल्लीत उपस्थित करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच विकास मोकाशी, शाहू मोकाशी, राजू मोकाशी, राजू गोणी, प्रकाश तोडकर, रामचंद्र मोकाशी, प्रल्हाद नार्वेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


