नौकुड ग्रामपंचायतीचे उपवनसंरक्षकांना निवेदन
शेतकऱ्यांवर आरोप करण्याऐवजी खऱ्या दोषींवर कारवाई करा!
गडहिंग्लज (प्रतिनिधी): किल्ले सामानगडावर लागलेल्या आगीत वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नौकुड ग्रामपंचायतीच्या वतीने उपवनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या सहीने देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, किल्ले सामानगड, चिंचेवाडी, नौकुड, हासुरसासगिरी वनक्षेत्र येथे वनविकास महामंडळ २००७ सालापासून कार्यरत असून विविध वृक्ष लागवडीखालील विशेष परिसर वनक्षेत्रावरती त्यांचा अंमल आहे. सतत बदली होणारे अधिकारी, काम करू शकणाऱ्या मजुरांची कमतरता व परिस्थितीचे नसणारे गांभीर्य यामुळे नोव्हेंबर महिन्यात गावठाण व वनक्षेत्र यांच्यामधील जाळपट्टे काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दिनांक २,३ व ८ मार्च रोजी लागलेल्या आगीत वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत वन्यजीव यांचे जीवन धोक्यात आले आहे. ह्या आगीचा आरोप शेतकऱ्यांवर लावला जात आहे. मात्र ही आग लागण्यामागे असणाऱ्या खऱ्या दोषींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


