एस.टीच्या महिला सन्मान योजनेत सीमाभागातील महिला प्रवाशांवर अन्याय
ठाकरे गट शिवसेनेचे गडहिंग्लज आगाराला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सरकारने राज्यातील महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीची महिला सन्मान योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा लाभ सीमाभागातील महिला प्रवाशांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गडहिंग्लज- कोल्हापूरसाठी महिलांना ४५ रुपये हा सवलतीचा तिकीट दर आकारण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी गडहिंग्लज आगाराला निवेदनातून दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना एस.टी.प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. परंतु कर्नाटक हद्दीतील प्रवासासाठी पुर्वीप्रमाणेच शंभर टक्के तिकिटाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सीमाभागातील महिला प्रवाशांवर अन्याय होत असल्याने सीमाभागातील जनतेत तीव्र नाराजी आहे.
गडहिंग्लज ते कोल्हापूर विनाथांबा बससाठी ९० रुपये तिकीट दर आहे. त्यात ५० टक्के सवलत म्हणून ४५ रुपये तिकीट दर आकारणी करणे आवश्यक आहे. परंतु काळभैरी ते कोगनोळी नाक्यापर्यंत कर्नाटकची हद्द असल्यामुळे या अंतरासाठी पुर्वीप्रमाणेच तिकिटाची पुर्ण रक्कम आकारली जाते. त्यामुळे ७० रुपये द्यावे लागत असल्याने केवळ २० रुपयांचीच सवलत मिळत आहे.
महाराष्ट्रातील महिलांसह सीमाभागातील ८६५ खेड्यातील महिलांना ५० टक्के सवलतीचा शंभर टक्के लाभ मिळण्यासाठी कर्नाटकसह अन्य राज्यांतून कराव्या लागणाऱ्या प्रवासातही ५० टक्के सवलत देण्याची गरज आहे. याकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे.
सीमाभागातील ८६५ गावातील मराठी महिलांना महाराष्ट्राच्या एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ देण्यात यावा, गडहिंग्लज- कोल्हापूर एस.टी. प्रवासाचे भाडे ९० रुपये आहे. गडहिंग्लजच्या येणाऱ्या- जाणाऱ्या महिलांना सरसकट ५० टक्के लाभ देवून महिलांना ४५ रुपये तिकीट दर आकारण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, रियाजभाई शमनजी, दिलीप माने, संतोष चिकोडे, प्रतिक क्षीरसागर, वसंत नाईक, भरत जाधव, आनंद माने, बाळू कुंभार, अवधूत पाटील, सुनील ढवरी, प्रकाश जाधव, विलास यमाटे, रवींद्र पाटील, प्रशांत घबाडे, सुशील विभुते, संभाजी येरुडकर, तेजस घेवडे, राजू जाधव, शालन नांगनुरे, वंदना जाधव, संजीवनी नांगनुरे, सुनिता पाटील, अनुसया भुईंबर, बेबा खामकर, सुरेखा शिंदे, अंजना देवकांबळे, आराध्या पवार, गीता लोहार, माधवी नाईक उपस्थित होते.


