शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज आगारातून कल्याण- डोंबिवलीसाठी एसटी बस सोडण्यात यावी अशी मागणी शिवसह्याद्री प्रतिष्ठाणच्या वतीने आगार व्यवस्थापकांकडे निवेदनातून केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बरेचसे नागरिक नोकरीच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी, लग्नसराई, यात्रा या निमित्ताने मुंबईकर ग्रामस्थ आपल्या मूळ गावी आले आहेत. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून कल्याण डोंबिवलीसाठी एसटी बस नसल्याने प्रवाशांना टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागतो. याचा विचार करता गडहिंग्लज आगारातून थेट कल्याण डोंबिवली साठी एसटी बस सुरू केल्यास मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिला प्रवाशांना लाभ मिळवता येईल. असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसह्याद्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सतिश पेडणेकर, उपाध्यक्ष संतोष पाटील, कोल्हापूर विभागाचे पदाधिकारी संतोष पडवळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

