संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
आजरा : आंबेओहोळ धरणग्रस्तांची पुनर्वसनासंदर्भात व्यथा समजावून घेण्यासाठी बैठक घेण्यात यावी व हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉ.शिवाजी गुरव यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन 40 टक्के बाकी असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जात आहे. आज पर्यंत शेकडो बैठका झाल्या मात्र तेच प्रश्न, अधिकाऱ्यांची तीच तीच उत्तरे या पलीकडे पुनर्वसन प्रक्रिया पुढे जात नाही. मागणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार भूखंड मिळाले नाहीत. थोडी जमीन व थोडे पॅकेज घेणाऱ्या शेतकऱ्यांना भूखंड मिळाले नाहीत. संकलन दुरुस्ती बाबत जिल्हास्तरावर निर्णय झाला तरी पुन्हा पुन्हा क्युरी काढून प्रकरण मागे ठेवले जाते. धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहेत.
16 मे रोजीच्या बैठकीचा संदर्भ देत शिल्लक राहिलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांना जाहीरनामा प्रसिद्ध करून जमीन वाटप करणे बाबत निर्देश देणे आले आहेत. मात्र ज्या जमिनी यापूर्वी धरणग्रस्तांनी नाकारल्या आहेत, ना पसंत केल्या त्याच त्याच जमिनीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे.
बैठक घेताना अधिकाऱ्यांना न बोलावता एक वेळ फक्त धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी धरणग्रस्तांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी. बैठकीला धरणग्रस्त शेतकरी व संघटना प्रतिनिधीं यांच्याशी चर्चा करावी. प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांना बोलते करून झालेल्या पुनर्वसनाचा आढावा वाचून दाखवण्यात बैठकीत वेळ जातो व धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. या एकमेव कारणाने पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित राहत आहे. स्वेच्छा पुनर्वसन झालेले पण न्यायालयात जाऊन निकाल झालेल्या धरणग्रस्तांची संख्या 200 हून अधिक आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासकीय पातळीवर कार्यवाही झाली नाही. तसेच अद्याप अर्धे पुनर्वसन व अद्याप पुनर्वसन न झालेले असे दीडशे शेतकरी बाकी आहेत. पॅकेज मागणी केलेले पण 1999 पूर्वी विवाह झालेल्या बहिणींचा तक्रार अर्ज आला एवढ्या कारणाने जवळपास तीन वर्ष पैसे दिले नाहीत, अगर स्वतःचा अधिकार वापरून संबंधित अधिकाऱ्यांकडून निकाल दिला नाही अशी अनेक प्रकरणे आहेत.
यासाठी धरणग्रस्तांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी या निवेदनातून केली आहे.

