शाळेतील तीन शिक्षकांची बदली झाल्याने अपुरी शिक्षक संख्या
बदली शिक्षक न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड येथील प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांची बदली झाली आहे. अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत असल्याने जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत एकाही विद्यार्थ्याला शाळेत पाठवणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी दिली.
शाळा व्यवस्थापन समितीने निवेदनात म्हटले आहे की, विद्या मंदिर नौकुड प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांची बदली झाली आहे. शाळेत दुसरे शिक्षक मिळण्याबाबत दिनांक ६ जून रोजी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप शाळेत एकही शिक्षक हजर झालेले नाहीत.त्यामुळे जोपर्यंत शाळेत शिक्षक हजर होत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवले जाणार नाही असा निर्णय घेतल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

