गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये गांधी विचार मंच गडहिंग्लज यांच्या वतीने महात्मा गांधी य़ांच्या विचारांचे प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राहुल जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कल्याणराव पुजारी, आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा.सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.एम.के.नोरेंज यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.अमर पाटील यांनी करून दिला. यावेळी गांधी विचार मंच गडहिंग्लजचे सुरेश पोवार यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला पाहिजे. खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, हे गांधीजींचे मत आज तंतोतंत साम्य दर्शवत आहे. गांधीजींना अपेक्षित असणारा भारत घडवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसेच्या मार्गाने सर्वांनी जाणे अपेक्षित आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून 'महात्मा गांधी यांचे विचार आणि आधुनिक भारतासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज' याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राचार्य कल्याणराव पुजारी, प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी पाडले यांनी केले.

