प्रकाश बालनाईक यांच्यासह ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
उत्खनन केलेल्या खड्ड्यात पडून आतापर्यंत चार जनावरांचा मृत्यू
नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी
![]() |
| कुंबळहाळ : खडक उत्खननासाठी गायरानात खोदण्यात आलेला खड्डा. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील कुंबळहाळ येथे गायरान जमिनीत सुरू असलेल्या खडक उत्खननाची चौकशी करण्यात यावी. तसेच या खड्ड्यात पडून आतापर्यंत चार जनावरांचा मृत्यू झाला असून याची भरपाई देखील देण्यात यावी अशी मागणी प्रकाश पुंडलिक बालनाईक यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गावातील गायरान परिसरात जनावरांना चरण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी सोडले जाते. या परिसरात खडक उत्खनन करून वीस ते पंचवीस फूट खोल खड्डे मारले आहेत. या खड्ड्यात प्रकाश बालनाईक यांची म्हैस पडल्याने ती दगावली. यामुळे श्री बालनाईक यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
![]() |
| कुंबळहाळ : खडक उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आतापर्यंत चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. |
याच खड्ड्यात गावातील आणखी तीन जनावरे पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या खडक उत्खननाची चौकशी करण्यात यावी तसेच उत्खनन करण्यात आलेल्या या खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या जनावरांची भरपाई संबंधित ग्रामस्थांना देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पुणे यांनाही पाठविण्यात आले आहेत.


