गडहिंग्लजला संजय गांधी निराधार योजना व इतर योजना प्रमाणपत्र वाटप
सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शासनामार्फत सुरू असलेल्या निराधारांच्या योजना विधवा परित्यक्त्या दिव्यांग यांच्यासाठी आधार बनले आहेत. निराधारांच्या अडीअडचणी समजून घेऊन वेळोवेळी आपण कायद्यामध्ये बदल केले आहेत. त्यामुळेच लाखो निराधार आज या योजनेचा लाभ घेत आहेत. पूर्वी केवळ २५० रुपये पेन्शन होती. ती आपण पंधराशे रुपयेपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सध्या ही पंधराशे रुपये पेन्शन तुटपुंजी असून निराधारांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन, पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले.
गडहिंग्लज येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर योजना प्रमाणपत्र वाटपप्रसंगी ते बोलत होते.
नामदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, निराधारांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाची अट वयाची अट कमी करून कायद्यात बदल केले आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी हरून सय्यद यांची नेमणूक करणार असल्याचे जाहीर केले. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य गोरगरीब लोकांची कामे करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा, असे सांगितले. आपल्या गावात कोण निराधार, विधवा, परीत्यक्त्या त्यांना कोणत्या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे, यासाठी कार्यकर्त्यांनी आपला परिसर पिंजून काढावा. त्यांनी अजिबात थांबू नये. राजकारणात प्रवेश करावयाचा असेल तर सेवाभावाचे काम केलेच पाहिजे, असे सांगितले. आपण आत्तापर्यत तालुक्याचा विकास आरोग्य व सर्वसामान्यची सेवा करण्यात धन्यता मानली आहे, असेही सांगितले.
तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी प्रास्ताविकातून गडहिंग्लज तालुक्यातील निराधार योजनेचा आढावा घेतला. तालुक्यात सध्या ८,६८२ निराधार लाभार्थी असून महिन्याला दोन कोटी, बारा लाख, ४७ हजार रुपये निधी वितरित होत असल्याची माहिती दिली. एप्रिल २०२३ ते आज अखेर जवळपास पंधराशे अर्ज मंजूर केल्याचे सांगितले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी मनोगतातून आधार योजनेबद्दल माहिती देऊन जर काही मुले आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. यावेळी सिद्धार्थ बन्ने, हरून सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सतीश पाटील, वसंतराव यमगेकर, सचिन देसाई, उषा मांगले, रामगोंडा पाटील, राहुल शिरकोळे, शाम हरळीकर, राजेंद्र यादव, शरद मगर, प्रकाश पठाडे, रेश्मा कांबळे, महेश सलवादे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व निराधार योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.






