महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी घेतल्या समजून
आजरा : संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आजरा- भुदरगडचे प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांना भेटून चर्चा केली. यावेळी प्रांताधिकार्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत प्रत्यक्ष शेताच्या व राहत्या घरांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दौऱ्याची नियोजन करत संघटना प्रतिनिधी, शेतकरी, महामार्गाचे अधिकारी, महसूल अधिकारी, सर्कल, गाव कामगार तलाठी, कंपनीचे प्रतिनिधी या सर्व टीमने प्रत्यक्ष पाहणी केली. अंतिम निवाडा प्रक्रिया चालू असून नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देण्यात आली.
शेतकऱ्यांना नियमानुसार दिलासा रक्कम व 12 टक्के व्याज देखील मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुनर्वसनाची जलद गतीने प्रक्रिया होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संघटना अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिवाजी इंगळे, दिगंबर हरंबळे, अण्णासो पाटील, सागर भाटले, संदीप कोंडुसकर, महामार्गाचे अभियंता अनिल पाटील व शेतकरी उपस्थित होते. उद्धव पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान, आज पुन्हा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आम्हाला समाधानकारक जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शेतात कोणत्याही प्रकारचे काम करू न देण्याचा निर्णय यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.


