कवी संमेलन, व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन, विक्री यासह बरेच कार्यक्रम
विविध क्षेत्रातील मान्यवर, कवी, साहित्यिकांची उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने गडहिंग्लज येथे शनिवार दिनांक 10 व रविवार दिनांक 11 फेब्रुवारी असे दोन दिवस 'कोल्हापूर ग्रंथोत्सव'चे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज महाविद्यालय येथे हा ग्रंथोत्सव होत आहे. यावेळी विविध ग्रंथांचे प्रदर्शन व विक्रीसाठी देखील पुस्तके उपलब्ध असणार आहेत.
शनिवार दिनांक 10 रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडीने या ग्रंथोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. ग्रंथ दिंडीचा शुभारंभ गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उदघाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष आ. प्रकाश आबिटकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, डॉ. विनय कोरे, पी एन पाटील, ऋतुराज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार अरुण लाड, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, श्रीमती जयश्री जाधव, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू आवळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
दोन दिवस चालणार विविध कार्यक्रम
शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी तीन वाजता "मी वाचलेले पुस्तक" यावर निवडक विद्यार्थ्यांचे मनोगत होणार आहे. त्यानंतर "डिजिटल जगाची बदलती आव्हाने" या विषयावर मुक्ता चैतन्य यांचा परिसंवाद आयोजित केला आहे.
रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी 11 वाजता "जागर शिव शाहू विचारांचा" या विषयावर गारगोटी येथील युवराज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी दोन वाजता कुंडल येथील कथाकथनकार जयवंत आवटे यांचे कथाकथन होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती गौरी भोगले असणार आहेत. या कवी संमेलनात डॉ. निलेश शेळके, विलास माळी, नंदकुमार गोरुले, निळकंठ कुराडे, रवींद्र कामत, आनंद बल्लाळ, श्रीमती निर्मला शेवाळे, सिद्धाप्पा बंदी, अनिल कलकुटगी, शिवाजी शिंदे, प्रा. सुभाष कोरे, संजय कांबळे, ओंकार बजागे, संतोष पाटील यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार करणार आहेत. दुपारी चार वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप कार्यक्रम पार पडणार आहे. या समारोपाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक शिवशंकर उपासे असून शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या ग्रंथोत्सवास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रंथोत्सव कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष व पुणे विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, सदस्य तथा शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह प्राध्यापक डॉ. विनोद कांबळे, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुशांत मगदूम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती अपर्णा वाईकर यांनी केले आहे.

