उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रतिपादन
नूलच्या सुरगीश्वर मठात सांस्कृतिक भवनची पायाभरणी
गडहिंग्लज (संतोष नाईक) : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असणारे नूल येथील सुरगीश्वर मठाने राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून मठाला एक वैभवशाली परंपरा आहे. नूल गावच्या जडणघडणीसह सीमा भागातील जनतेच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वाटचालीत या मठाचे भरीव योगदान आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील सुरगीश्वर मठाच्या सांस्कृतिक भवनची पायाभरणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी परमपूज्य गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, कृषिमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
सुरगीश्वर मठाच्या विकासासाठी साडेपाच कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सांस्कृतिक सभागृहासाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचे भूमिपूजन आज करण्यात आले. प्रारंभी मंत्री महोदयांचे नूल ग्रामस्थांनी फुलाच्या पाकळ्या टाकून मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्री सुरगीश्वर संस्थान मठाला भेट देऊन गुरु लिंगैक्य ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मठाची पाहणी करुन मठाधिपती श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासोबत संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी मेळावा देखील पार पडला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील हा माझा तिसरा दौरा आहे. या जिल्ह्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला नेहमीच वाटत होतं. त्यामुळे येथील विविध समस्या व प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत आणि यापुढे देखील राहतील. गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावात आल्यानंतर येथील मुलींनी माझं फुलाच्या पाकळ्यांनी केलेलं स्वागत मी कधीच विसरणार नाही. असे सांगत मुलींचे त्यांनी कौतुक केले. राज्यातील मुलींना सुविधेअभावी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये याची काळजी आमच्या महायुतीच्या सरकारने घेतले आहे. शक्य तितक्या सोयी सवलती त्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. महाराजांनी येथील जनतेला न्याय, पुरोगामी चळवळीला बळ, वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गुणवंत गरीब मुला मुलींना पाठबळ देण्याचे काम केले आहे. यामुळे कोल्हापूरवासियांची एक वेगळी ओळख राज्यात आहे. नूल येथील सुरगीश्वर मठाने आपली वैभवशाली परंपरा जपली आहे. विविध संकटात, आपत्कालीन परिस्थितीत या मठाने मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे, चर्चा, संवाद घडवून आणणे आवश्यक असते. त्यामुळे मठातील या सांस्कृतिक भवनमुळे ते साध्य होईल. मठातील हे भवन सर्वांना एकत्र आणण्याचे काम करेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे सरकार हे राज्यातील वंचित शेवटच्या माणसापर्यंत विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतीमाला भाव वाढ, दूध दरवाढी संदर्भात सकारात्मक निर्णय सरकारने घेतले आहेत.
गडहिंग्लजच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध!
गडहिंग्लज तालुक्यातील विविध प्रश्नांची दखल उपमुख्यमंत्री अजितदादांनी यावेळी घेतली. ते म्हणाले, गडहिंग्लज तालुक्यातील एकूण सात महसुली मंडळातील 95 गावे दुष्काळामध्ये येतात. या पार्श्वभूमीवर या गावांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. प्रामुख्याने गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर बनतो. या प्रश्नाबाबत आमदार राजेश पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे पूर्व भागातील नरेवाडी, तेरणी, येणेचवंडी या लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्रालयात सचिवांना दिले आहेत. आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत, पोकळ आश्वासन आम्ही देत नाही असे देखील अजितदादांनी सांगितले. राष्ट्रवादीत काम करताना कोणाचातरी अवमान करावा, कोणाला तरी त्रास व्हावा ही माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची अजिबात भावना नाही. काम करताना सर्वसमावेशक घटकांना संधी देण्यात आली आहे. यावेळी अजितदादांना गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याबाबत बोलताना अजितदादांनी ज्या मागण्या रस्ता व व्यवहारिक आहेत त्यांचा जरूर विचार केला जाईल असे आश्वासन दिले.
"त्या" वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 50 हजार अनुदान जमा करणार!
राज्यातील ७० हजारांवर प्रामाणिक कर्जदार शेतकरी ५० हजारांच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत यामध्ये कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा कर्जाची उचल व तारखेचा घोळ झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल. 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची ग्वाही अजितदादानी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
अजितदादांची इच्छा... अन राष्ट्रवादीचे पालकमंत्री
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे यासाठी गेली 24 वर्ष प्रयत्न सुरू होते. मात्र ते शक्य होत नव्हते. या जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुरुवातीला हर्षवर्धन पाटील, चंद्रकांतदादा पाटील, सतेज पाटील, पतंगराव कदम, दीपक केसरकर यांना मिळालं. हे पद हसन मुश्रीफ यांना मिळावं ही माझी इच्छा होती. आता ही इच्छा पूर्ण झाली असून कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री पद राष्ट्रवादीला मिळवून देण्यात आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे काम जनतेला माहित आहे. त्यामुळे या पदाला ते नक्की न्याय देतील यात शंका नाही. असा विश्वास देखील अजितदादांनी व्यक्त केला
पोलिसांनी दबावाला बळी पडू नये, खुलेपणाने काम करावे!
राज्यातील विविध प्रश्ने सोडवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारची मदत घेतोय. केंद्राकडून सर्वाधिक निधी महाराष्ट्रासाठी आणायचा आहे. असे सांगतानाच विरोधक आरोप, बदनामी करत आहेत. काही गोष्टी घडत आहेत मी नाही म्हणत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गेल्या आठ दहा दिवसात राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्या. दोघ बोलत बसले एकाने दुसऱ्याला गोळी घातली, कुठे सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने गोळी झाडण्याचं काम केलं. परंतु या घटनांचा तिथल्या तिथं तपास कसा होईल याकडे लक्ष देण्यात आला आहे. कोणीही मोठ्या बापाचा असला, सत्ताधारी पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. कायदा व संविधान सर्वश्रेष्ठ आहे. पोलिसांनी खुलेपणाने काम करावे. कुठेही राजकीय हस्तक्षेप होत असला तरी दबावाला, कुणाच्या दादागिरीला, गुंडगिरीला व दहशतीला बळी पडता कामा नये. असे सांगून राज्यातील जनतेची सुरक्षिततेला सरकार प्राधान्य देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
सुरगीश्वर मठाच्या सेंद्रिय शेती संकल्पनेस सहकार्य करू : कृषिमंत्री धनंजय मुंडे
यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सुरगीश्वर मठाच्या 27 एकर जागेत सेंद्रिय शेती करण्याचा मानस मठाधिपती गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचा आहे. पिकांवर वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे कॅन्सर सारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे स्वामीजींची सेंद्रिय शेतीची संकल्पना निश्चितच चांगली आहे. यासाठी कृषी विभागाकडून यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती उपमुख्यमंत्री अजितदादांकडे त्यांनी केली.
पूर्व भागाच्या पाणी प्रश्नाकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेधले अजितदादांचे लक्ष
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नूलच्या सुरगीश्वर मठाची गडहिंग्लजला जागा आहे. या ठिकाणी एमपीएससी अभ्यासिका सुरू करण्याचा विचार गुरुसिद्धेश्वर स्वामीजींनी माझ्याजवळ व्यक्त केला आहे. यासाठी आपले सहकार्य असून भव्य दिव्य एमपीएससीचे एक चांगले केंद्र गडहिंग्लज येथे सुरू करू असे आश्वासन त्यांनी दिले. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी जवळपास एक हजार कोटींचा निधी खेचून आणला आहे. या माध्यमातून मतदार संघात गावागावात विकास कामे करण्यासाठी ते यशस्वी ठरले आहेत. आमदार पाटील यांना जनतेने पुन्हा संधी दिल्यास हा विकास निधी दोन हजार कोटींवर जाईल यात तीळमात्र शंका नाही. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिरण्यकेशी नदीवरील आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पातील पाण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे असून यासाठी चित्री प्रकल्पाची उंची वाढवावी लागेल. हे काम पूर्णत्वास गेल्यास पूर्व भागाला उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई कायमस्वरूपी निकालात काढता येईल याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे त्यांनी लक्ष वेधले.
गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीत उद्योगधंद्यांची गरज, विभागात कृषी विद्यापीठ स्थापन करावे : आमदार राजेश पाटील
आमदार राजेश पाटील म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळामुळे मला आमदार होत आले. चंदगड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून साडेआठशे कोटी रुपयांचा निधी आणला. यामध्ये मंत्री मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांचे योगदान महत्वाचे आहेत. या सर्वांच्या पाठबळामुळे मतदारसंघात मला विकासाचा डोंगर उभा करता आला. जे 40 वर्षात झाले नाही ते साडेचार वर्षात करून दाखविणे शक्य झाले. यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता ही अजितदादाप्रेमी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मतदारसंघात विविध उद्योगधंदे आणून बेरोजगारांच्या हाताला काम देणे काळाची गरज आहे. त्यामुळे गडहिंग्लज येथील शेंद्री माळावरील औद्योगिक वसाहतीत उद्योगधंदे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करत या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर या विभागात एखादे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी परमपूज्य गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचे आशीर्वाचन झाले.
या कार्यक्रमास खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, ए वाय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील, जयसिंग चव्हाण, रामाप्पा करीगार, जयकुमार मुन्नोळी, महाबळेश्वर चौगुले, दीपक जाधव, अनिकेत कोणकेरी, अभिजीत पाटील, दशरथ कुपेकर, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश पाटील, नूलच्या सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, पी एम चव्हाण, जितेंद्र देसाई, भाई पताडे, शिवानंद देसाई, मुन्ना नाईकवाडी, दीपक पुजारी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत राजेश पाटील औरनाळकर तर प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले. संजय थोरात यांनी आभार मानले.








