घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान
ग्रामीण रस्त्याच्या दोन्ही बाजूला जोड रस्त्याचीही गरज
ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
ग्रामपंचायतीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर-बांदा महामार्गावरील निलजी या ठिकाणी गटारीचे बांधकामच करण्यात आलेले नसल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. महामार्गाचे काम करताना गटार बांधकामाकडेच दुर्लक्ष झाल्याने येथील ग्रामस्थांना याचा त्रास सोसावा लागत आहे. तातडीने येथील विविध समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ निलजी गावातून गेला आहे. या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला गटर्स बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या 50 ते 60 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरूर मोठे नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण मार्ग क्रमांक 152 या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जोड रस्ता करणे गरजेचे असून त्याचे काम करण्यात आले नाही.
त्याचबरोबर निलजी येथे बसस्टँडचे बांधकाम करण्यात आलेले आहे, मात्र त्यामध्ये लाईटची सोय करण्यात आलेली नाही. निलजी ते नूल हा रस्ता गावातून जातो. त्यासाठीमुख्य रस्ता ओलांडण्यासाठी हायमास्क पोल बसविणे गरजेचे आहे. महामार्गाचे काम करताना सदर कंत्राटदराने निलजी गावावरच अन्याय केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विविध समस्यांची वेळीच सोडून करावी अन्यथा ७ जूननंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
यावेळी सरपंच आप्पासाहेब गडकरी, उपसरपंच सुरेश कुरबेटटी, ॲड. डी. बी. नागोंडा, बाबू नाईक, सोहेल सय्यद, साहिल सय्यद, अमित निलापगोळ, नमाज सय्यद ,अशोक पाटील, भरमगोंडा पाटील, राजू हुकेरी, संदीप जाधव, राजेंद्र जरळी, अण्णासो वाळकी, नमाज नदाफ उपस्थित होते.




