मुख्य रस्त्यावरील पूररेषेतील दुकानांचे साहित्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने अन्यत्र हलवले
छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी नदीची पूरस्थितीची तीव्रता वाढत असून पुराचे पाणी आता भडगाव पैकी कल्याणी तळ येतील लोक वस्ती पर्यंत गेले आहे. खबरदारी म्हणून भडगाव मुख्यमार्गावरील पूर रेषेतील दुकानांमध्ये साहित्य आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने सुरक्षितस्थळी हलवले आहे.
गडहिंग्लजसह तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीला गेल्या तीन दिवसापासून पूर आला आहे. भडगाव पुलावर पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढले असून गडहिंग्लज- चंदगड राजमार्ग पूर्णतः ठप्प झाला आहे. पुराचा वेढा हळूहळू वाढत असल्याने नागरिक देखील चिंतेत असल्याचे दिसत आहेत. आज सायंकाळी भडगावच्या कल्याणी तळ येथील. विलास कल्याणी यांचा पत्रा शेड आणि अक्षय सनकी यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. खबरदारी म्हणून मुख्य रस्त्यावरील पूररेषेतील दुकानाचे साहित्य आपत्ती व्यवस्थापचे सदस्य वसंत नाईक, पोलीस पाटील उदय पुजारी यांच्यासह त्यांच्या टीमने इतरत्र सुरक्षितस्थळी हलविले. जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पुराची पातळी वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनच्या स्थानिक यंत्रणेने ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.




