गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने भडगाव पुलावर पाणी आले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद केले आहे. त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सकाळी दहा नंतर ठप्प झाली आहे.
यंदाच्या पावसात पहिल्यांदा पुलावर पाणी आले आहे. गेले तीन दिवस गडहिंग्लज तालुक्यात पावसाला जोर आहे. तसेच पश्चिमेकडे आजरा भागात सुरू असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. या नदीवरील निलजी बंधारा गुरुवारपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नुल मार्गे वाहतूक बंद आहे. आज ( शनिवार) पहाटे साडेपाच वाजल्यापासून भडगाव पुलावर देखील पाणी आले आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, तलाठी सौ. रूपाली कांबळे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने खबरदारी घेतली होती. सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेतील वाहनाना वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर बॅरिकेट्स लावून पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने वाहन चालकांना पर्याय मार्गाबाबत मार्गदर्शन करत आहेत. भडगाव पूल बंद असल्याने पर्याय मार्ग म्हणून महागाव, गजरगाव, इंचनाळ, बेळगुंदी, गिजवणे हा मार्ग सुचवण्यात आला आहे.



