उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांचे आश्वासन
प्रांत कार्यालयासमोर करण्यात येणारे आंदोलन स्थगित
मात्र दि. 10 जुलै रोजी आंबेऒहळ धरणस्थळावरील 'जलसमाधी आंदोलनावर' धरणग्रस्त ठाम
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नां संदर्भात येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिल्याची माहिती कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नांसंदर्भात प्रांत कार्यालयात बैठक पार पडली. दरम्यान, दिनांक 10 जुलै रोजी आंबेओहोळ धरणस्थळावर होणाऱ्या जलसमाधी आंदोलनावर मात्र धरणग्रस्त ठाम आहेत. वरिष्ठ स्तरावरून चर्चा झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे संजय येजरे यांनी सांगितले.
आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न अजून शिल्लक असून याबाबत तातडीने बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेने केली होती. या संदर्भात दिनांक 2 जुलै पासून प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर दिनांक 1 जुलै रोजी सायंकाळी गडहिंग्लज प्रांताधिकारी याच्या कार्यालयात धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी येत्या पंधरा दिवसात यासंदर्भात बैठक घेण्याचे ठरले. यावेळी कॉम्रेड शिवाजी गुरव, बाबुराव नाईक, संजय येजरे आदींनी चर्चेत भाग घेत धरणग्रस्तांचे प्रश्न मांडले. सर्व प्रश्नाबाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये व्यापक बैठक घेऊन प्रश्न सर्व मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकार्यांनी संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव याना दिले.प्रांत कार्यालयासमोर करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे कॉम्रेड गुरव यांनी सांगितले.
'जलसमाधी आंदोलनावर' मात्र ठाम!
दिनांक 10 जूलै रोजी आंबेऒहळ धरणस्थळावर जलसमाधी आंदोलन होणार असून सदर आंदोलनाबाबत चर्चा व निर्णय वरीष्ठ पातळीवर होणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यामुळे दि.10 जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनावर मात्र ठाम असल्याचे व आंदोलन होणार असल्याचे संजय येजरे यांनी सांगितले.

