कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे परिवर्तनाचा अनुभव घेत आहे आणि कोल्हापूर ते पुण्यादरम्यान वंदे भारत ट्रेनमुळे या भागातील परिवहनाचे एक नवे युग सुरू होईल,असे रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमण्णा यांनी आज कोल्हापूर येथे सांगितले. कोल्हापूर येथून वंदे भारत ट्रेनला रवाना करण्याच्या समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पंतप्रधानांनी आज देशभरात आणखीही वंदे भारत गाड्याना झेंडा दाखवून रवाना केले.
राज्यमंत्री सोमण्णा यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसलाही अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 43 कोटी मिळाले आहेत. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे प्रदूषणमुक्त होईल आणि तिचे कार्बन उत्सर्जन योगदान निव्वळ शून्य असेल, असे सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, खासदार श्री शाहू छत्रपती उपस्थित होते. मध्य रेल्वेचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रभात रंजन यांनी आभार प्रदर्शन केले. पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील 11वी वंदे भारत ट्रेन आहे.
वंदे भारत ट्रेन्सची माहिती
पंतप्रधानांनी आज भूज-अहमदाबाद वंदे मेट्रो, पुणे-एसएसएस हुबळी, कोल्हापूर-पुणे, नागपूर-सिकंदराबाद, आग्रा कँट-बनारस, रायपूर (दुर्ग)-विशाखापट्टणम आणि वाराणसी-प्रयागराज (भारतातील पहिली 20-डब्यांची वंदे भारत) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन यांना हिरवा झेंडा दाखवला.



