नागरिकांमधून मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांचा पुढाकार
प्रा.शिवाजीराव परुळेकर यांच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा
आजरा : उत्तुर स्वतंत्र तालुका मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या पुढाकाराने आठवडी बाजारात सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
शनिवारी उत्तुरचा आठवडी बाजार असतो. आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावांचे नागरिक उत्तूर येथे येतात. याचेच औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी उत्तूरला स्वतंत्र तालुका म्हणून मान्यता मिळावी यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम थेट बाजारात बसून सुरू केली. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
अवघ्या दोन ते तीन तासात शेकडो नागरिकांनी सह्या केल्या. हे पाहून बऱ्याच तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या सह्या शासनाला पोहोच केल्या जाणार आहेत. उत्तूर स्वतंत्र तालुका झाल्यास उत्तूर गावच्या जवळपास असणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार असून लोकांचा वेळ, पैसा व श्रम वाचण्यासाठी मदत होणार आहे.
राज्य शासनाने नवीन तालुके निर्माण विभाजनासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे असे समजते. उत्तूर स्वतंत्र मागणीबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी अहवालही मागवले आहेत. तसे लेखी आदेश आजरा - भुदरगडचे प्रांताधिकारी यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र प्रा.शिवाजीराव परुळेकर यांना आले आहे. अशी माहिती कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. त्यामुळे उत्तूरला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी उत्तुरसह आसपासच्या गावातील ग्रामपंचायतीचे ठराव तसेच नागरिकांच्या सह्या अशा वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये सर्व गावातील नागरिकांनी सहभाग घेऊन मागणी केल्यास लवकरच उत्तूरला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळेल, असे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव म्हणाले.



