कारभारात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात शुक्रवारी भडगाव रोडवर झालेल्या एसटी अपघाताच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज आगाराला शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. आगाराने सुस्थितीतील गाड्याच विविध मार्गावर सोडाव्यात अशी सूचना करून कारभारात देखील सुधारणा करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या संदर्भात तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांना निवेदन देण्यात आले.
आगाराकडे प्रवासी संख्येच्या मानाने गाड्यांची संख्या अपुरी आहे, याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. याबाबत आगारातून वरिष्ठ स्तरावर कोणता पाठपुरावा करण्यात आला अशी विचारणा तालुकाप्रमुख अजित खोत यांनी आगार प्रमुखांना केली. त्याचबरोबर ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसेस वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघातही होत आहेत. परिणामी याचा मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागत आहे. मुदतबाह्य झालेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी देण्यात येऊ नयेत. आगाराने याची दखल घेऊन तातडीने सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. भडगाव रोडवर झालेल्या एसटी अपघाताची माहिती यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली. आगाराने घडलेल्या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न न करता वस्तुस्थिती सांगावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख अजित खोत, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपशहरप्रमुख संदीप चव्हाण, बाळू कुंभार, श्रीशैल साखरे, अनिल खानाई, मनीष हावळ, गजाभाऊ सासने, उत्तम गोरूले, विभागप्रमुख दिगंबर पाटील, विलास यमाटे, कमलेश गोरुले, संभाजी येडुरकर, संकेत रावण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

