येणेचवंडी येथील ज्ञानदीप वाचनालयामार्फत 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत व्याख्यान
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जगावे कसे याचे धडे देण्याचे काम पुस्तके करतात. स्वामी विवेकानंदांचे 'जीवनमार्ग' व साने गुरूजींची 'श्यामची आई' यासारखी पुस्तके म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे.शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मोहजालात न अडकता फावल्या वेळात पुस्तके वाचनासाठी वाचनालये जवळ करावीत असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष दत्ता देशपांडे यांनी केले.
येणेचवंडी (ता.गडहिग्लज) येथील ज्ञानदीप वाचनालयामार्फत आयोजित 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा'या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होतेम विद्यामंदिर येणेचवंडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दशरथ राऊत हे होते.
प्रा. प्रकाश इंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दत्ता देशपांडे यांचा मुख्याध्यापक उत्तम यमगेकर यांच्या हस्ते तर नेसरीच्या ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठाचा 'सरसेनापती' आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल मालन बामणे व तिसरी मराठीसाठी तयार केलेल्या चित्रफितीस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अनिल गोणी यांचा देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. नीळकंठ कुराडे यांनी आभार मानले.
यावेळी मुख्याध्यापक उत्तम यमगेकर,आनंदा कुराडे, विनायक पोवार,सोमशेखर हिरेमठ,दिलीप कुमार पाटील,श्रीकांत मांगले,प्रशांत भोसले यांच्यासह विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.





