मुगळीत महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातूनच ध्येय बाळगले पाहिजे. यासाठी शाळेतील निबंध व वाचन स्पर्धेत भाग घ्यावा. यातून व्यक्तिमत्व विकास घडून भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी याचा उपयोग होईल, असे प्रतिपादन निळकंठ कुराडे यांनी केले.
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयामध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रम कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते.
सरस्वती प्रतिमेचे पूजन गुरुलिंगा आरबळे गुरुजी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना श्री. कुराडे पुढे म्हणाले, नमस्कारमध्ये खूप मोठी जादू आहे. आई-वडील हे आपले पहिले गुरु आहेत. त्यानंतर शिक्षक आपले दुसरे गुरु मानले जातात. नेहमी या गुरुजनांचा आपण आदर केला पाहिजे. पहिला नमस्कार यांना केला पाहिजे. महिलांमध्ये नवदुर्गाचा अवतार असतो. त्यामुळे समाज उद्धारात महिलांचे मोठे योगदान आहे. शाळेतील अभ्यासात नेहमी मुली हुशार असतात. कारण ते मन लावून अभ्यास करतात, निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतात. त्यांचा आदर्श मुलांनी घेतला पाहिजे. आपण दिवसातून एक तरी चांगले काम केलं पाहिजे. दुसऱ्यांना मदत केलं पाहिजे. वाढदिवसाला केक नेण्याऐवजी वही, पेन पुस्तक भेट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनावर अधिक भर दिला पाहिजे. वाचनाने मन स्थिर होते, असे सांगून श्री. कुराडे यांनी अनेक उदाहरणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून कर्मयोगी पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुलिंगा आरबोळे यांचा तर विद्या मंदिर शाळेत शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनुराज वाघ यांचायावेळी सत्कार करण्यात आला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचनालय मार्फत दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनही पार पडले.
स्वागत व प्रास्ताविक सचिव ए बी जाधव यांनी केले. या कार्यक्रमास कार्यवाह बी जी स्वामी, सुरेश पाटील, ईश्र्वर हुल्लोळी, सागर आरबोळे, विजय महाडिक, सुरशेन प्रियदशी, सुनिल सागर, सौ. परवीन कदशेल, ग्रंथपाल के डी धनवडे, श्रीपाद स्वामी, राजु मागं यांच्यासह सभासद, वाचक विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. आभार कलापा धनवडे यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीपाद स्वामी यांनी केले.








