गडहिंग्लज (प्रतिनिधी): असुसं प्रकाशन आणि असुसं लिखित 'चिकोत्रा काठची माणसं' या पहिल्या वाहिल्या पुस्तकाचा बामणे (ता भुदरगड) येथे त्याच पुस्तकातील पात्रांच्या हस्ते प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल खवरे, विनायक चव्हाण उपस्थित होते.
या पुस्तकाच्या निमित्ताने गत आठवणींना, जुन्या विचारांना, जुन्या लोकांना मानवंदना देण्यासाठी आम्ही या पुस्तकाचे लेखन केले आहे असे पुस्तकाचे लेखक असुसं यांनी आपली बाजू मांडली. चिकोत्रा खोऱ्यातील माणसांचा परिपूर्ण जीवन आलेख म्हणजे हे पुस्तक असल्याचे मत सचिन दुधाळे यांनी व्यक्त केले. मातीतल्या माणसांचा, त्यांच्या घामाचा, संघर्षाचा आरसा म्हणजे पुस्तकं असल्याचे हणमंत पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक दिनकर खवरे यांनी केले. सदर पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या पुस्तकातील पात्रांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसून येत होता. यावेळी अनिल जकिनकर, दत्ता डावरे, नामदेव लोंढे, गणेश मेंगाणे, अशोक बोरनाक, श्री पावले, श्री मगदूम, बामणे ग्रामस्थ व इतर उपस्थित होते.






