इनाम म्हाळूंगेचे प्राथमिक शिक्षक रोहित पवार झाले सातव्यांदा अधिकारी
चंदगड : नोकरी म्हणजे सोनं झाल आहे. त्यात अन जर सरकारी नोकरी म्हटली की डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. नोकरीच्या मागे धावता धावता वयाच्या मर्यादाच संपूण गेल्या आहेत. पण मनामध्ये प्रचंड ध्येय, जिद्द असेल अन कष्ट करायची तयारी असेल तर सरकारी नोकरीच्या पाठीमागे आपण धावण्या ऐवजी त्या नोकऱ्यांना आपल्या पाठीमागे धावायला लावण्याचा विक्रम इनाम म्हाळूंगे येथील मराठी विद्यामंदिर चे प्राथमिक शिक्षक रोहित विनायक पवार यानी केला आहे. एमपीएसीत सलग सात वेळा अधिकारी पदावर निवड होऊनही प्राथमिक शाळेत रममान होऊन विद्यार्थी घडविणाऱ्या या ध्येयवेड्या प्राथमिक शिक्षकाचा नोकरीचा प्रवास सर्वांनाच एक प्रेरणादायी ठरणारा आहे.
यवतमाळ जिल्हयातील रोहित पवार यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले आहे. शेतकरी असणाऱ्या आईवडीलांची रोहितने शिक्षक बनावी अशी तीव्र इच्छा होती. आई-वडीलांच्या इच्छेखातर रोहितने गणित विषयातून एम एस्सी, इंग्रजी साहित्य विषयातून एम.ए व नंतर बीएड केले. यानंतर चंदगड तालुक्याच्या इनाम म्हाळुंगे येथे परीक्षेच्या माध्यमातून जूनमध्ये पदवीधर अध्यापक म्हणून निवड झाली. स्पर्धा परीक्षा दिलेल्या रोहित पवार यांचे एकामागोमाग एक असे निकाल येत गेले. यातून आरोग्य विभाग अमरावती, पदवीधर शिक्षक कोल्हापूर, भांडारपाल जलसंपदा विभाग नागपूर, आरोग्य सेवक भंडारा, राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ, कारागृह शिक्षक अशा सहा जागी निवड झाली.
काल लागलेल्या MPSC च्या निकालामध्ये पुन्हा एकदा सातव्यांदा सहायक महसूल अधिकारी म्हणून निवड झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सलग सात वेळा यशाला गवसणी घालुनही प्राथमिक शाळेत रमणाऱ्या रोहीत सारखा एखादाच हिरा असू शकतो.
या उज्वल व विक्रमी यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी सौ. सुमन सुभेदार, इब्राहिमपूर केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद भादवणकर केंद्रातील सर्व शिक्षकानी अभिनंदन केले.
अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम केल्यास यश नक्की!
सहा वेळा सरकारी नोकरी सोडून दिल्याने त्या जागी अन्य उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले. यातच माझे समाधान आहे. माझे ध्येय अजूनही खूप मोठे आहे. ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य करणारच आहे. असा ठाम विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. युवकांनी अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते. यासाठी मन, मेंदू अन मनगटाचा योग्य वापर करण्याचा सल्लाही रोहीत पवार यानी दिला.

