ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती पोवार यांचे मत
गडहिंग्लजला सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्राचीन काळापासून स्त्रीयांना दुय्यम मानून पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीयांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. आजही राजकारण, समाजकारण आणि एकूणच समाजव्यवस्थेमध्ये महिलांना स्वतंत्र काम करीत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, जाणीवपुर्वक अडचणी निर्माण केले जातात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महिलांकडे सत्ता येत आहेत, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या महिलांनी ठरविले पाहिजे. महिला आरक्षण ५० टक्के हे संघर्षातून मिळविलेले आहे याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे आणि स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करता एकमेकांवर चांगला विश्वास ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल केले पाहिजे असे मत कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती पोवार यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्ट व विविध पुरोगामी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. आशा पाटील होत्या.
स्वागत व प्रास्ताविक सौ. श्रध्दा शिंत्रे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमती शोभा शिंत्रे यांनी करुन दिला. प्रमुख अतिथींचा सत्कार सौ. आशा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना रेहाना मुरसाल म्हणाल्या, महाराष्ट्रात स्त्रीयांच्या मुक्ततेसाठी संघटना पातळीवर खूप चांगले काम झाले असून त्याचे चांगले परिणाम आज दिसत आहे. पण मुस्लिम स्त्रीयांच्या स्वातंत्र्यासाठी अजूनही खूप काम करावे लागेल. कॉ. संपत देसाई यांनी स्त्री चळवळीचा आढावा घेतला. अक्कम महादेवी या स्त्री चळवळीच्या जनक असून आज समाजामध्ये अनेक स्त्रीया स्त्रीयांच्या हक्कासाठी गंभीरपणे व संघटीतरित्या लढत आहेत यातूनच परिवर्तन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सौ. रेखा पोतदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आभार श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी पाटील यांनी केले.



