महात्मा फुले हे आजही सर्वच चळवळींचे मार्गदर्शक : कॉ. संपत देसाई
आजरा (हसन तकीलदार ) : देशभरात 11 एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी केली जाते. 11एप्रिल 1827 रोजी पुण्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब महिला, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांच्या जयंतीनिमित्य आजऱ्यात श्रमिक मुक्ती दलातर्फे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दशरथ घुरे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहून भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पहिल्यांदा मांडणी केली. ते केवळ नकारात्मक मांडणी करीत राहिले नाहीत तर त्यांनी शेती, शेतकरी यांच्या विकासाची भूमिका मांडत पर्यायी विकासाचा पाया घातला. पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, गरज पडेल तिथे बाहेरून पाणी आणून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बंद पाईपने मोजून देण्याची मागणी त्यांनी पहिल्यांदा केली. जमीन पाणी नियोजनाची शास्त्रीय मांडणी पहिल्यांदा महात्मा फुले यांनी केली. जीवनाचे असे एकही क्षेत्र नसेल ज्या क्षेत्रात त्यांनी काम केले नाही. साहित्य संस्कृती, शिक्षण, जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासह धर्मसुधारणा या सर्वच क्षेत्रात त्यानी अभूतपूर्व असे काम केले आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंबर यांच्यावर पोवाडा लिहून धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला म्हणूनच ते आजही सर्वच चळवळीचे मार्गदर्शक आहेत. स्त्रियांच्यासाठी त्याचे मोलाचे योगदान आहे. स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुले करणारे ते पहिले समाजसुधारक आहेत.
यावेळी प्रकाश मोरुस्कर, सुरेश पाटील, महादेव मालव, यशवंत राणे, राखमाजी पाटील, आनंद मालव, लक्ष्मी जाधव, गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


