ग्रंथालय संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशांत मगदूम यांचे मत
मुगळी येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपण काय व्हायचे आहे ते आत्ताच निश्चित केले पाहिजे तरच आयुष्यात तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकाल असे मत कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुशांत मगदूम यांनी व्यक्त केले.
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय सेवक पत संस्थेचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र मधुकर सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते.
बोलताना प्रा. मगदूम पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा. विद्यार्थी दशेत वाचन हे फार महत्त्वाचे असून त्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानपणापासूनच पुस्तके वाचायला सुरुवात केली म्हणूनच त्यांच्याकडे ग्रंथसंपदा फार मोठी होती. स्वामी विवेकानंदांचे लहानपणापासूनचे विचार फारच प्रेरणादायक आहेत. जिज्ञासू व सामाजिक कार्यामध्ये रुची असलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. समाजातील गरीब व गरजू लोकांबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती होती. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा ते नेहमीच बाळगत होते. त्यामुळे त्यांचाही आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेणे महत्त्वाचे आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले चांगले संस्कार व विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांना व येथील युवा व तरुण वर्गाला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुगळी सारख्या गावात सुरू केलेले सार्वजनिक वाचनालयाचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे येथील उपलब्ध ग्रंथसंपदेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत सचिव आप्पासाहेब जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुशांत मगदूम यांचा सत्कार सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रंथमित्र मधुकर सुतार यांचा सत्कार उपाध्यक्ष आप्पासाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आला. निकिता माने, जोतिबा लोखंडे, मिलिंद कांबळे, सौरभ शिंडलाळे, सतीश धनवडे यांचा विशेष सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. विक्रम शिंदे, निकिता माने सौरभ शिडलाळे,एस एन खडकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष आप्पासाहेब कदम, कार्यवाह बी जी स्वामी, सचिव आप्पासाहेब जाधव, ईश्वर हुल्लोळी, विजय महाडिक, विक्रम शिंदे, गजानन कांबळे, सागर आरबोळे, डॉ आप्पासाहेब माने, सुरशन प्रियदर्शी, एस के सागर, संजवनी शिंदे, एस एन खडकेकर, ग्रंथपाल के डी धनवडे, लिपिक श्रीपाद स्वामी, राजेंद्र मागं, विजय इंगळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी वाचक ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ईश्वर हुलोळी यांनी मानले.






