उच्च वारसा स्थळ "ब" वर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा
कोल्हापूर जिल्हा भाजपा अभियंता आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ऐतिहासिक"सामानगड" किल्ल्याचा महाराष्ट्रातील" उच्च वारसा स्थळ "ब" वर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास करून "भारत सर्किट यात्रेत" समावेश करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा भाजपा अभियंता आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
राजा भोज यांनी बांधलेल्या आणि सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यानी विकसित केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ल्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जवळील पन्हाळगडाबरोबरच या किल्ल्याला भेट दिल्याची इतिहासात नोंद आहे. किल्ल्याचे किल्लेदार चिंचेवाडी गावचे मुंजाजी कदम यानी या किल्ल्याचे विजापूरच्या आदिलशाहीच्या हल्ल्यापासून जीवापाड रक्षण केले असून किल्ला आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यावर श्री भवानी मातेचे मंदिर असून, अंधार भाव, सात कमानीची विहीर, वेताळ बुरूज, वाघाची खिंड आहे. स्थानिक दुर्गवीर प्रतिष्ठानने बरेचसे कष्ट घेऊन किल्ल्याच्या बऱ्याच भागाचा अमुल्य ठेवा शोधून काढून उघड केला आहे. किल्ल्याशेजारी दरीत सत्पुरुष वाचासिध्दी प्राप्त भिमशाप्पा महाराजांची जिवंत समाधी असून शेजारी पांडव मंदिर, समर्थ रामदास स्वामींनी बलाच्या साधनेसाठी स्थापन केलेले हनुमान मंदिर, श्री राम सीता आणि महादेव मंदिर गुंफा आहेत. वनवासात असताना प्रभू श्रीरामानी इथूनच सुर्य मंदिरातून सूर्योपासना केल्याची आख्यायिका आहे.
या संपूर्ण परिसराचे पावित्र्य मोठे असून या भुभागाने परम पवित्र ओम आकार धारण केला आहे. हे जगातील एकमेव उदाहरण आहे. पन्हाळगड ते सामानगड ते कर्नाटकातील बेळगाव शहरातील भुईकोट किल्ल्याला भुयाराने जोडलेले आहे. तालुक्यातील कसबा नूल या गावात दुसरे किल्लेदार रहायचे त्यांच्याशी नूल म्हणजे कानडी भाषेत सुत याद्वारे दळणवळण साधले जायचे. दरीमध्ये जीवंत पाण्याचे कुंड असून ते अरबी समुद्राशी जोडलेले आहे. पवित्र विशाळी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी येथे भिमाचा उत्सव म्हणून दरवर्षी मोठी यात्रा भरते. मोठी आर्थिक उलाढाल होते. जरळी, भडगाव,मुगळी, नुल, हसुरसासगिरी येथील ग्रामदैवतांच्या पालख्यांची गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत भेट होते. आध्यात्मिक उन्नतीचे आणि एकात्मतेचे हे केंद्र जगाशी जोडले जाणे आवश्यक आहे.
तत्कालीन आमदार आणि विधानसभेचे सभापती, माजी सहकार राज्यमंत्री, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून या किल्ल्याचा 'क' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून काहीसा विकास झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' खाली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत रायगड, प्रतागड बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांसह पन्हाळगडाचाही समावेश होत आहे. त्यामुळे हे समृध्द वारसा स्थळ जागतिक नकाशावर येण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तहसिलमधील ऐतिहासिक "सामानगड" किल्ल्याचा महाराष्ट्रातील उच्च वारसा स्थळ "ब" वर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास करून "भारत सर्किट यात्रेत" समावेश करण्याची गरज आहे, याकडे चंद्रकांत सावंत यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे.



