Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वामीत्व योजनेमार्फत तयार करण्यात आलेले गावठाण नकाशे तालुका स्तरावरच दुरुस्त व्हावेत!

आजरा तालुका सरपंच परिषदेची मागणी 




आजरा (हसन तकीलदार ) : पंचायत राज मंत्रालयाची "स्वामीत्व योजना" ही ग्रामीण घर मालकांना हक्काचे रेकॉर्ड प्रदान करण्यासाठी पंचायतराज मंत्रालय, राज्य महसूल, राज्य पंचायत विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नानी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून आलेली योजना आहे. मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करणे, जमीन क्षेत्राच्याअचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेचे संबंधीत वाद कमी करणे, ग्रामीण नागरिकांना त्यांच्या क्षेत्राचे आर्थिक मालमत्ता कर्ज आदी फायद्यासाठी स्वामीत्व योजना सुरु करण्यात आली. परंतु या स्वामीत्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या नकाशामुळे ग्रामपंचायतीना विकासात्मक लाभ होण्यापेक्षा तंटे मिटवण्यात वेळ वाया जात असताना दिसत आहे. फायदे कमी आणि तोटेच जादा दिसत आहेत यासाठी यावर उपाययोजना सुचवावे व बदल करावा अशी मागणी आजरा तालुका सरपंच परिषदेने आजरा तहसीलदार समीर माने, भूमी अभिलेख यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

     


स्वामीत्व योजनेतून तयार करणेत आलेल्या एकाही गावचा नकाशा सुबक व अचूक झालेला दिसत नाही. गावातील रस्ते, खुल्या जागा, नाले, सार्वजनिक शाळा, देऊळ, समाज मंदिरे, सहकारी संस्था इमारती त्याचबरोबर व्यक्तिगत मालमत्तेचे क्षेत्र, त्यांचा आकार, अंतर्गत बोळ रस्ते यामध्ये असंख्य चुका दिसून येत असतात. सदरच्या असणाऱ्या असंख्य चुकाबाबतच्या दुरुस्तीसाठी विहीत नमुन्यामध्ये कायदे सल्लागारांच्या म्हणजेच वकिलांच्या मार्फत अर्ज करणे त्यांच्या छाननीसाठी सदरचा अर्ज हा आपल्या जिल्हा कार्यालयाकडे पाठविणे इत्यादी प्रक्रिया खूप वेळखाऊ, खर्चिक व त्रासदायक आहेत. त्यामुळे ही दुरुस्ती प्रक्रिया तालुकास्तरीय उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्येच महसूल ग्रामपंचायत व भूमिअभिलेख कार्यालयाकडील पुराव्यांचा आधार घेऊन करण्यात येऊन प्रत्येक गावचा सिटीसर्व्हे नकाशा अद्यावत करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर गावठाण लागतच्या 500 मीटर परिघाच्या क्षेत्रामधील मालमत्तेचे (प्लॉट, इमारत, जमीन ) गावठाण हद्दवाढीमध्ये समावेश करण्यात यावा, गावठाण लगतचे यापूर्वी मान्यता दिलेल्या बिगरशेती केलेल्या क्षेत्राची नोंद सदरच्या नकाशामध्ये अंतरभूत केल्यास गावच्या विकासात्मक योजना राबविणेसाठी ग्रामपंचायतीला सोयीचे होईल त्यामुळे ही दुरुस्ती प्रक्रिया तालुका स्तरीय उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयामध्येच करणेत येऊन प्रत्येक गावाचा सिटीसर्व्हे नकाशा अद्यावत करावा अशा मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देत यांच्या प्रति जिल्हा भूमीअभिलेख कार्यालय, ग्रामविकास मंत्री, पालक मंत्री, आमदार- चंदगड विधानसभा,वैद्यकीय शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

   


यावेळी जी. एम. पाटील (जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद ), पांडुरंग तोरगल्ले (तालुकाध्यक्ष ), प्रियांका जाधव (महिला तालुकाध्यक्ष ), युवराज पाटील (कार्याध्यक्ष ), समीक्षा देसाई (कार्याध्यक्षा ), विलास जोशीलकर (उपाध्यक्ष ), वैषाली गुरव (सरपंच बुरुडे), आनंदा कांबळे (सरपंच गाजरगाव ), रत्नजा सावंत (सरचिटणीस ), धनाजी दळवी (खजिनदार ), माधुरी गुरव (खजिनदार ), सुनील बागवे (सदस्य ), पांडुरंग खवरे (सदस्य ), वसंत कोंडूसकर (सदस्य ), संकेत सावंत (उपसरपंच पेरणोली ), शकुंतला सुतार (सरपंच हत्तीवडे ),मारुती पवार (सरपंच वेळवट्टी ) उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.