आजी-माजी सैनिकांचे मंत्री शंभूराज देसाई यांना साकडे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्यातील आजी-माजी सैनिकांना सैनिक भवन आणि शहीद जवानांच्या स्मारकासाठी गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जय जवान जय किसान फाउंडेशनच्या आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केली आहे. सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांची पाटण येथे भेट घेऊन याबाबत चर्चा करण्यात आली.सैनिकांच्या समस्या जाणून घेऊन घेत मंत्री देसाई यांनी मुंबईत पुढील आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील आजी-माजी सैनिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, शासकीय कार्यक्रम एकत्रित साजरे करणे, होतकरू मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण, त्यांचे मनोबल वाढविणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाचनालय, वीर पुरुषांचे दालन उभारणे, शहीद जवानांचे स्मृती स्मारक उभारणीसाठी प्रत्येक गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी सैनिक भवन गरजेचे आहे. राज्यात शासनाच्या राखीव जागा, गावागावांत गायरान, गावठाण, मुलकीपड जमिनी उपलब्ध आहेत, त्यातील गावासाठी ५, शहरांत १० व जिल्ह्याच्या ठिकाणी २० गुंठे जागा मिळावी. याबाबत अधिवेशनात लक्षवेधी सूचनेचे ठराव होऊन मंजुरी मिळावी. सध्या आजी-माजी सैनिकांसाठी हक्काची जागा नाही. रात्री-अपरात्री येणाऱ्या सैनिकांची मोठी कुंचबणा होते. गाव गाठणे गैरसोयीचे असते. त्यावेळी सैनिक भवन सोयीचे ठरणार आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, हरळी खुर्द येथील शहीद जवान शामराव आयवाळे यांच्या स्मारकाच्या जागेबाबतही चर्चा झाली. शासकीय सेवेतील पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या प्रश्नांचाही उहापोह करण्यात आला.
शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील, सचिव रामकृष्ण शेंडे, हरळी खुर्दचे उपसरपंच शशिकांत चौगुले, श्रीकांत शिंदे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.



