सहा जिल्ह्यांतून समाधान ; वकिलांकडून आनंदोत्सव साजरा
कोल्हापूर : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ स्थापनेची अधिसूचना काल जारी करण्यात आली असून येत्या १८ ऑगस्टपासून खंडपीठ कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे, यासाठी सुरु असलेल्या तब्बल ४० वर्षांच्या लढ्याला यश आले आहे. या खंडपीठामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांची सोय होणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात वकिलांनी पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर यानंतर आता हे चौथे खंडपीठ महाराष्ट्रात कार्यान्वित होत आहे.

