५ नंबर वार्डमधील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
त्वरित स्वच्छता करून औषध फवारणी करण्याची रहिवाशांची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील ५ नंबर वार्डामधील जुना कळवीकट्टे रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असून, आरोग्य धोक्यात आल्याने त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली आहे. या परिसरातील कचरा तातडीने हटवून जंतुनाशक औषध फवारणी करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
झूडुप, कचरा अन् सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव
ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५ मध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. झुडुप, कचऱ्याचे साचलेले ढीग आणि सांडपाण्याच्या अयोग्य निचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरात डासांचे प्रमाण कमालीचे वाढले असून डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या अस्वच्छतेचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्याला बसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे.
औषध फवारणीसह तातडीने स्वच्छतेची मागणी
ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने दखल घ्यावी. परिसराची स्वच्छता करून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण वार्डात जंतुनाशक औषध फवारणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुनील तोडकर, करवीर नंद्यापगोळ, रियाज जमादार, निंगाप्पा बुध, सुबराव बेळी, संगय्या औरगोळ, करवीर बेळी, शिवाप्पा बेळी, करवीर कागीणकर, गंगाराम कागीणकर, लगमाना बेळी, विठ्ठल नरेवाडी, सतीश तेगनाळे, सुलोचना नरेवाडी, जयश्री नरेवाडी, सखाराम नरेवाडी, मीरासाहेब नरेवाडी, बसवंत फडके, मलिक नाईकवाडी, मालुताई बेळी यांच्यासह ५ नंबर वार्डातील इतर नागरिकांच्या सह्या आहेत.


