Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर जिल्ह्याचा 47 हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा


शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना द्या

 

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप करा

 



कोल्हापूर :  बँकांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना देऊन बँकांनी वार्षिक पतपुरवठ्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट सप्टेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या. 


जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात पार पडली.  कोल्हापूर जिल्ह्याचा 47 हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखड्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.


यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी अधिकारी अभिनव खरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, बँक ऑफ इंडिया चे उपअंचलित प्रबंधक विशाल सिंग, नाबार्डचे व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, केडीसीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे तसेच बँकर्स उपस्थित होते.



जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, शासनाच्या विविध महामंडळांनी तालुका निहाय शिबिरांचे आयोजन करुन शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच विविध योजनांतर्गत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. अर्जासोबत जोडण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित अर्जदारांना देऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. तसेच पाठपुरावा ठेवून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. सर्व महामंडळे व बँकांनी तालुकास्तरीय बँकर्स च्या बैठकांमध्ये सहभागी व्हावे, परस्पर समन्वय ठेवून योजनांचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना त्यांनी केल्या.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती शेतकऱ्यांना देवून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीत मागील वर्षी कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर होता. यावर्षी देखील सर्व बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करुन राज्यात चांगले काम करावे. वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन करुन डिजिटल फसवणुकी संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री मुद्रा, रोजगार निर्मिती, विश्वकर्मा, जनधन, सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आदी विविध योजनांबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विविध महामंडळाच्या  योजनांतर्गत देण्यात आलेले वार्षिक उद्दिष्ट व साध्य तसेच प्रलंबित प्रकरणांच्या कारणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे जलद मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या.



कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे सन 2026-27 चे उद्दिष्ट 47 हजार कोटींचे आहे. जिल्ह्यात जून अखेर 20 हजार 71 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले असून वार्षिक उद्दिष्टाच्या 43 टक्के उद्दिष्ट पूर्तता झाली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार यांनी दिली. 


जिल्ह्यातील विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक तसेच बँकांचे जिल्हा समन्वयक यांनी विविध योजना अंतर्गत कर्ज वाटप करण्यासाठी दिलेले उद्दिष्ट व आजवर करण्यात आलेले कर्ज वाटप याबाबत ची माहिती बैठकीत दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.