देवस्थान जमिनी, शेतमजूर, कर्जमुक्ती व शेतीमालाच्या भावावर होणार वज्रमूठ
आजरा (प्रतिनिधी): वाढता शेती उत्पादन खर्च, निसर्गाची साथ नसताना शेतीमालाला न मिळणारा हमीभाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि निसर्गाचा कोप यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी वर्ग आज गंभीर संकटात सापडला आहे. या आव्हानांचा सामना करत शेतकरी चळवळीला नवी दिशा देण्यासाठी रविवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता आजरा येथील 'श्रमिक पतसंस्था, जिजामाता कॉलनी' येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य 'संघर्ष व लढा मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरात येत्या ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी अखिल भारतीय किसान सभेचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पार पडणार आहे. या ऐतिहासिक अधिवेशनाची पूर्वतयारी आणि आजरा तालुक्यातील स्थानिक प्रश्नांवर एल्गार पुकारण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे अध्यक्षपद कायदेतज्ञ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. दशरथ दळवी भूषवणार आहेत.
अखिल भारतीय किसान सभेने आपल्या प्रदीर्घ वाटचालीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, वीज व सिंचन, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील मदत, ऊस व दूध उत्पादकांचे प्रश्न, वनहक्क आणि जमीन संपादनाविरोधात नेहमीच धगधगता संघर्ष उभारला आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनीचा प्रश्न, कष्टकऱ्यांचे हक्क आदी प्रश्नांवर लढा उभरला जाणार आहे.
किसान सभेचे जिल्हा सहसचिव व समन्वयक कॉ. संग्राम सावंत, आजरा तालुक्यातील किसान सभेचे नेते कॉ. शिवाजी गुरव, देवस्थान व मठ ट्रस्ट जमीन लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते शिवाजी गिलबिले आणि भाकपा (माले) व गिरणी कामगार संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष कॉम्रेड शांताराम पाटील हे मेळाव्यात प्रमुख भूमिका मांडणार आहेत.
शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला बळ देण्यासाठी शेतकरी-कष्टकऱ्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक कॉ. शिवाजी गुरव, समीर खेडेकर, शिवाजी गिलबिले आणि संजय कांबळे (अखिल भारतीय किसान सभा, आजरा तालुका) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

